आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात पाच वेळा IPL विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या हंगामात संघर्ष करताना दिसत आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्ससाठी यंदाच्या हंगामात टिकणेही मुश्किल झाले असताना आता हार्दिक पांड्याच्या नेृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत आहे. न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज आणि दिग्गज समालोचक सायमन डूल यांनी हार्दिक पांड्यासोबत स्पष्ट मत मांडत त्याला रिलीज करावे, असा सल्लाच MI ला दिला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हार्दिकला रिलीज करा
सायमन डूल यांच्या मते, जर मुंबई इंडियन्स पुढील हंगामात नेतृत्वबदलाचा विचार करत असेल, तर हार्दिकला संघात कायम ठेवणे धोकादायक ठरू शकते. क्रिकबझशी बोलताना ते म्हणाले की, “पुढच्या वर्षी तुमचा कर्णधार कोण असेल? हा मुख्य प्रश्न आहे. जर बदल करणार असाल आणि हार्दिक कर्णधार नसेल, तर त्याला रिलीज करणे हाच योग्य पर्याय ठरेल.
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
हार्दिकवर लावलेला डाव उलटला
यावेळी सायमन डूल यांनी MI ड्रेसिंग रूममधील वातावरणावरही भाष्य केले. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराहसारखे दिग्गज संघात असताना हार्दिक पांड्याकडे नेतृत्व देणं हा चुकीचा निर्णय होता. असे मत मांडताना ते पुढे म्हणाले की, गुजरात टायटन्समध्ये हार्दिक यशस्वी झाला कारण ती नवी फ्रँचायझी होती आणि संघ त्याच्या पद्धतीने घडवता आला. पण मुंबईत परतल्यानंतर त्याने थेट ‘किंग’ बनण्याचा प्रयत्न केला आणि हा डाव पूर्णपणे उलटला, असेही त्यांनी स डूल यांनी म्हटले आहे.
हार्दिक पांड्याही बॅटिंग-बॉलिंगमध्ये छाप सोडण्यात अपयशी
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात हार्दिक पांड्याची वैयक्तिक कामगिरीही निराशाजनक राहिली आहे. सात सामन्यांत त्याने केवळ १२८ धावा केल्या असून गोलंदाजीतही त्याची धार हरवलेली दिसली. १२ पेक्षा अधिकच्या इकॉनॉमी रेटसह त्याने धावा खर्च केल्या आहेत.
व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह
सायमन डूल यांनी अपयशासाठी केवळ हार्दिकलाच नव्हे, तर मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनालाही जबाबदार धरले आहे. नेतृत्वबदलाचा निर्णय आणि त्याची अंमलबजावणी या दोन्ही बाबतीत फ्रँचायझीने केलेल्या निर्णयांवर आता मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत.