औरंगाबाद : हडको एन-११ मयूरनगर, सुदर्शननगर भागातील पाणीपुरवठा वेळापत्रक कोलमडल्यामुळे गुरुवारी नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले. तसेच पाहणीसाठी आलेल्या मनपा अभियंत्यांना तासभर बसवून ठेवल्याचा प्रकार घडला. पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर अधिकाऱ्याची सुटका करण्यात आली.
गुळाचा चहा पिण्यासाठी आम्हाला येथे बोलावले होते, आम्हाला कुणीही बसवून ठेवले नाही, अशी सावध प्रतिक्रिया मनपा अभियंत्यांनी दिली. मयूरनगर - सुदर्शननगरात गुरुवारी पाणीपुरवठ्याची वेळ होती. ६ तास उलटूनही नळाला पाणी न आल्याने नागरिक संतापले. पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता पद्मे, गिरी, मानकापे यांना नागरिकांनी पाणी येण्यास उशीर का होतोय, याची विचारणा केली. संतापलेल्या नागरिकांनी व्हॉल्व्हजवळच ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर महापालिकेचे अधिकारी - कर्मचारी हजर झाले. या सगळ्या ताफ्याला नागरिकांनी तासभर बसवून ठेवले. यापुढे वेळेवर आणि सुरळीत पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन पद्मे यांनी दिले. त्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. नागरिकांनी आम्हाला गुळाचा चहा घ्यायला या म्हणून, आग्रह केल्याने सर्वजण याठिकाणी गेल्याचे अभियंत्यांनी सांगितले. रमेश ईधाटे, किरण खरे, कैलास पवार, विजय जाधव आदींचा आंदोलनात सहभाग होता.
-------------
खामनदी पात्राची प्रशासकांकडून पाहणी
औरंगाबाद: महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शहरातील खामनदी पात्रातील अतिक्रमणे काढण्याचे आदेश गुरूवारी यंत्रणेला दिले. खामनदीची स्वछता व पुनरूज्जीवन मोहीम हाती घेण्यात आली असून, बारापुल्ला गेट येथे सुरू असलेल्या स्वच्छता व इतर कामांची पाहणी करताना तेथील अतिक्रमणांमुळे आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. नदीवरील अतिक्रमणे स्वत: काढून घेण्यासाठी नागरिकांना सूचना करावी, त्यांनी दिलेल्या कालावधीत अतिक्रमणे काढली नाहीत तर जेसीबी लावून ती काढण्याची कारवाई करावी, असे निर्देशही पाण्डेय यांनी दिले.
-----------
मालमत्ताकरासाठी गाळा केला सील
औरंगाबाद: महापालिकेच्या प्रभाग-५ मधील वसुली पथकाने गुरूवारी जाधववाडी नवा मोंढा परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील सेल हॉल क्रमांक दोन मधील गाळा क्रमांक ३४ सील केला. मालमत्ताधारक सुंदरलाल मुनोतकडे २ लाख २८ हजार १५२ रूपयांचा मालमत्ता कर थकलेला आहे. ही कारवाई पथकप्रमुख मुकुल बांगर, वसुली कर्मचारी रमेश फुले यांनी केली.
---------
७७८२ घरांचे आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण
औरंगाबाद: महापालिका आरोग्य विभागाने डेंग्यू प्रतिबंधासाठी गुरुवारी शहरातील सर्व ९ प्रभागांत मलेरिया पथकांनी सर्वेक्षणाची मोहीम राबवली. यात एकूण ७,७८२ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. १३० डेंग्यूच्या डास उत्पत्तीची स्थाने आढळल्याने तेथे औषध फवारणी करून ती नष्ट करण्यात आली.