कारखाली चिरडले, कोणाला मदतही करू दिली नाही; अखेर तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 12:46 IST2026-04-27T12:45:07+5:302026-04-27T12:46:14+5:30
वाट्या भाईने कारखाली चिरडलेल्या तरुणाचा मृत्यू; ५ आरोपींवर खुनाचा गुन्हा

कारखाली चिरडले, कोणाला मदतही करू दिली नाही; अखेर तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : खुनाची धमकी देत कारखाली चिरडलेल्या सूरज रमेश देवकाते (वय ३५) या तरुणाचा उपचारादरम्यान रविवारी (दि. २६) पहाटे मृत्यू झाला. गत पाच दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. या प्रकरणात अटक पाच आरोपींच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदविला असल्याची माहिती सातारा पोलिसांनी दिली.
पैठण रोडवरील संताजी पोलिस चौकीसमोर सराईत गुंड नवनाथ ऊर्फ वाट्या भाई मोटे याच्या कारने (एमएच २०, जीई ९९७१) सूरजला २० एप्रिलच्या रात्री जोराची धडक दिली. या घटनेपूर्वी दोघांमध्ये पाटोदा रोडवरील एका बीअरबारसमोर पैशांच्या देवाणघेवाणीवरून आणि एकमेकांकडे खुन्नस देण्यावरून वाद झाला होता. याचाच राग मनात धरून कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सूरजच्या अंगावरून कार रिव्हर्स घेऊन त्याला चिरडले. सूरजच्या भावासह इतरांनी त्यास जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वाट्या भाई आणि त्याच्या साथीदारांनी याला कोणीही उचलू नका असे म्हणत दहशत माजवली. या गुंडांनी चरण आणि इतर मित्रांनाही बेदम मारहाण केली. तब्बल २० मिनिटे या टोळक्याने रस्त्यावर राडा घालत जखमीला वेळेवर उपचार मिळण्यापासून रोखले होते. सूरजवर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर रविवारी पहाटे त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या पश्चात आई, पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे.
सातारा पोलिसांकडून पाच आरोपी अटक
या घटनेनंतर सातारा ठाण्याचे उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले आणि नंदकुमार भंडारे यांच्या पथकाने मुख्य सूत्रधार नवनाथ ऊर्फ वाट्या भाई मोटे याच्यासह भागवत गजानन मोटे, आकाश गोविंद वाघमोडे, अभिषेक दहिवाळ आणि गोरख दिलीप शिंदे (सर्व रा. कांचनवाडी) या पाच आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सर्वांना २७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर नातेवाइकांनी आक्षेप घेत संताप व्यक्त करीत ठाण्यासमोर २३ एप्रिलला आंदोलन केले होते. त्यानंतर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न हे कलम वाढवले. आता सूरजचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविले आहे.