छ. संभाजीनगर अग्निशमन दलात जर्मन तंत्रज्ञानावर आधारित १५ कोटींचे अत्याधुनिक वाहन दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 15:35 IST2026-04-15T15:33:29+5:302026-04-15T15:35:02+5:30
३६ मीटर उंचीवर वॉटर टॉवरची झेप; अग्निशमन दलात जर्मन तंत्रज्ञानाचा प्रवेश, कर्मचाऱ्यांचा जीव आता धोक्यात येणार नाही.

छ. संभाजीनगर अग्निशमन दलात जर्मन तंत्रज्ञानावर आधारित १५ कोटींचे अत्याधुनिक वाहन दाखल
छत्रपती संभाजीनगर : शहरात आता १५ व्या मजल्यापर्यंतच्या इमारती उभारण्यास सुरुवात झाली आहे. उंच इमारतींना आग लागल्यास मनपाकडे तेवढी सक्षम, अत्याधुनिक यंत्रणा नव्हती. तब्बल १५ कोटी ७८ लाख रुपये खर्चाचे जर्मन तंत्रज्ञानावर आधारित वाहन खरेदी करण्यात आले असून, या वाहनाचे लोकार्पण बुधवारी सकाळी ११ वाजता महापालिका मुख्यालयात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते होणार आहे.
जिल्हा नियोजन समितीमार्फत वाहने खरेदीसाठी गतवर्षी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. ३६ मीटर उंचीच्या अत्याधुनिक मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर सेट मशिनरीची खरेदी करण्यात आली. या वाहनात १४ हजार लिटर पाण्याची क्षमता असलेला वॉटर बाउजर आणि अग्निशमनासाठी उपयोगी रोबोटचा समावेश आहे. ही यंत्रणा जर्मन तंत्रज्ञानावर आधारित असून स्विंग या नामांकित जर्मन कंपनीची आहे. भारतातील मुंबई येथील अधिकृत प्रतिनिधीमार्फत या मशिनरीचा पुरवठा करण्यात आला आहे. ही अत्याधुनिक यंत्रणा १० ते १२ मजली इमारतींमध्ये लागलेल्या आगीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यास सक्षम ठरणार आहे.
वैशिष्ट्ये काय?
वॉटर टॉवरच्या बूमवर बसवलेल्या मॉनिटरिंग कॅमेरा जिथे आग लागली तेथे पाठवता येते. आग किती मोठी आहे, हे लक्षात येते. थर्मल कॅमेऱ्याच्या साहाय्याने वाहनाच्या कंट्रोल पॅनेलमधून ऑपरेटरला तळमजल्यापासूनच आगीवर नियंत्रण मिळविता येते. यामुळे अग्निशमन कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष आगीजवळ जाण्याचा धोका टाळता येणार आहे. यंत्रणेमध्ये असलेल्या रोबोटच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्याचे काम अधिक सुरक्षित आणि जलदगतीने पार पाडता येणार आहे. आगीच्या जवळ पंपसह रोबोट पाठविता येऊ शकते. कर्मचाऱ्याला आगीजवळ जाण्याची गरज नाही.
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
लोकार्पणानंतर मनपा अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर या मशिनरीचा प्रत्यक्ष वापर सुरू करण्यात येणार आहे. या नव्या यंत्रणेच्या समावेशामुळे शहरातील अग्निशमन सेवा अधिक सक्षम, सुरक्षित आणि परिणामकारक होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.