मित्रांनीच काढला काटा! जुन्या वादातून गुन्हेगाराची क्रूर हत्या; छत्रपती संभाजीनगरमध्ये टोळ्यांचा उच्छाद
By सुमित डोळे | Updated: April 22, 2026 12:15 IST2026-04-22T12:14:45+5:302026-04-22T12:15:16+5:30
छत्रपती संभाजीनगर हादरले! गोळीबारानंतर आता टोळीयुद्धातून हत्या; रोहित उर्फ करण मस्केचा जीव घेतला.

मित्रांनीच काढला काटा! जुन्या वादातून गुन्हेगाराची क्रूर हत्या; छत्रपती संभाजीनगरमध्ये टोळ्यांचा उच्छाद
छत्रपती संभाजीनगर: शहरातील पुंडलिकनगर भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबाराची शाई वाळते न वाळते तोच, गारखेडा परिसरात एका २५ वर्षीय तरुणाची त्याच्याच मित्रांनी निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रोहित उर्फ करण रवी मस्के (रा. मुकुंदवाडी) असे मृत तरुणाचे नाव असून, ही हत्या मंगळवारी मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास महेरसिंग नाईक महाविद्यालय परिसरात घडली.
जुन्या वादाचे रक्तरंजित पर्यावसान
रोहित मंगळवारी रात्री गारखेड्यातील काही मित्रांना भेटण्यासाठी गेला होता. प्राथमिक माहितीनुसार, त्यांच्यात जुन्या मारहाणीच्या कारणावरून वाद सुरू होता. रात्री पुन्हा याच मुद्द्यावरून वाद उफाळून आला आणि संतापलेल्या मित्रांनी रोहितवर चाकूने सपासप वार केले. छाती, गळा आणि पोटात खोलवर जखमा झाल्याने आणि मध्यरात्रीची वेळ असल्याने मदतीविना रोहितचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास हा रक्ताचा सडा उघड झाला.
पोलिसांची कारवाई आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी
घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकार आणि पुंडलिकनगरचे निरीक्षक अशोक भंडारे यांनी पथकासह धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. मृत रोहितवर मुकुंदवाडी आणि पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा टोळीयुद्धाची चर्चा सुरू झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.