औरंगाबादेत राष्टवादीला जिल्हाध्यक्ष मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 11:41 PM2018-06-02T23:41:04+5:302018-06-02T23:42:30+5:30
राष्टÑवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील आले तरी औरंगाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षाच्या नियुक्तीला मुहूर्त लागेना. त्यामुळे या पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्यांचा हिरमोड न झाल्यास नवल.
स. सो. खंडाळकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राष्टÑवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील आले तरी औरंगाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षाच्या नियुक्तीला मुहूर्त लागेना. त्यामुळे या पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्यांचा हिरमोड न झाल्यास नवल.
वैजापूरचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर हे राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असून नसल्यासारखे आहेत. २०१९ च्या निवडणुका जवळ येत असल्याने त्यांना त्यांच्या मतदारसंघातच लक्ष घालायला वेळ कमी पडतो. त्यामुळे मला मतदारसंघातच लक्ष घालू द्या, असा आग्रह त्यांनी आज नव्हे तर फार पूर्वीपासूनच धरून जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी टाळली आहे. सुनील तटकरे अध्यक्ष होते, तेव्हापासूनच ते जिल्हाध्यक्ष असून नसल्यासारखे आहेत. स्वत: अजित पवार यांनी येऊन हडकोतील राष्टÑवादी भवनात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. तेव्हापासून नव्या अध्यक्षाच्या नियुक्तीला मुहूर्त लागतच नाही. सुनील तटकरे गेले, आता जयंतराव पाटील नवे प्रदेशाध्यक्ष बनले. ते जाणकार व अभ्यासू म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या असतानाच अद्याप नव्या जिल्हाध्यक्षाच्या नियुक्तीला मुहूर्त लागत नाही. त्यामुळे इच्छुकांची घालमेल वाढली आहे.
आमदार जिल्हाध्यक्ष असल्यास कामे होण्यात अडचणी येत नाहीत, हे धोरण अजित पवारांचे होते. त्यातून पूर्वी संजय वाघचौरे व आता भाऊसाहेब चिकटगावकर यांच्या गळ्यात ही माळ पडली होती. परंतु आमदार आधी आपल्या मतदारसंघाकडे लक्ष देतो व फार कमी वेळ संघटनेला देतो, असेच सिद्ध झाल्याने हा प्रयोग फसला असेच म्हणावे लागेल.
सुधाकर सोनवणे यांचा कार्यकाळ तसा उल्लेखनीयच राहिला. विविध आंदोलने, राजकीय घडामोडी, निवडणुकांमध्ये राष्टÑवादी काँग्रेसचा बोलबाला असायचा. आता जणू औरंगाबाद जिल्हा राष्टÑवादीच्या नेत्यांनी वाऱ्यावरच सोडून दिला असल्याचे जाणवत आहे. अलीकडे झालेल्या विविध निवडणुकांमध्ये राष्टÑवादी काँग्रेसचा परफॉर्मन्स नगण्य राहिला आहे. राष्टÑवादी भवनातील चहलपहलही कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर सक्षम जिल्हाध्यक्षांची नियुक्ती लवकरात लवकर होईल काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
नावे नुसतीच चर्चेत
भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, संजय वाघचौरे व सुधाकर सोनवणे यांना सोडून रंगनाथ काळे, विलास चव्हाण, माजी आमदार कैलास पाटील गंगापूरकर, पांडुरंग तांगडे पाटील ही नावे पूर्वीपासूनच स्पर्धेत आहेत. यापैकी कोण अध्यक्ष होणार ही उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. जयंतराव पाटील यांना भेटून आलेल्या इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्या असल्या तरी अजित पवार यांच्या मनात नेमके कोण आहे व काय आहे, यावरच सारे अवलंबून आहे.