मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 06:05 IST2026-05-03T06:05:05+5:302026-05-03T06:05:56+5:30
झाले असे की, केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शनिवारी देशभरात 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टीम' अधिकृतपणे लाँच केली. या प्रणालीमुळे नागरिकांना त्यांच्या भागातील आपत्कालीन परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तींबाबत त्वरित पूर्वसूचना मिळणार आहे.

मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास देशभरातील कोट्यवधी मोबाइल फोनवर एक भीतिदायक सायरन रिंग वाजली आणि क्षणभर सर्वांचाच काळजाचा ठोका चुकला. आपला फोन हॅक झाला काय किंवा बँकेतील पैसे हॅकरने गायब केले का, अशा भीतिदायक शंका प्रत्येकाच्या मनात आल्या. पण, मोबाइलच्या इंटरफेसवर 'एक्सस्ट्रिमली सिव्हिअर अलर्ट' असा इंग्रजी व मराठीत मेसेज झळकला आणि मेसेज वाचल्यानंतर शंकाकुशंकांचे निरसन झाले.
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
झाले असे की, केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शनिवारी देशभरात 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टीम' अधिकृतपणे लाँच केली. या प्रणालीमुळे नागरिकांना त्यांच्या भागातील आपत्कालीन परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तींबाबत त्वरित पूर्वसूचना मिळणार आहे. ही प्रणाली कार्यान्वित होताच शनिवारी देशभरातील कोट्यवधी मोबाइल फोनवर अलर्टचे संदेश धडकले. लोकांमध्ये भीती निर्माण होऊ नये म्हणून दूरसंचार विभागाने २९ एप्रिल रोजीच या चाचणीबाबत नागरिकांना सूचित केले होते आणि संदेशाकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले होते. पण, तसे झाले नाही. या अलर्ट संदेशानंतर सोशल मीडियावर हजारो हेरगिरीच्या प्रतिक्रिया पडल्या. नागरिक एकमेकांना या अलर्टबाबत विचारणा करत होते.
'सेल ब्रॉडकास्ट' तंत्रज्ञान म्हणजे काय ?
भारत सरकारची आपत्कालीन मोबाइल अलर्ट प्रणाली नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची पायरी आहे. ही प्रणाली कोणत्याही अॅपशिवाय थेट प्रत्येक मोबाइलवर सूचना पोहोचवते. मोबाइल सायलेंट असला तरी अलर्टचा आवाज ऐकू येतो. सर्व नैसर्गिक आपत्तीत इशारा देऊन नागरिकांचे जीव वाचवता येतात.
विनायक पंडित, संचालक पीएकेओ टेक्नॉलॉजीस प्रा. लि.
भारताने युद्धजन्य परिस्थितीत प्रत्येक भारतीयाला अलर्ट मेसेज देण्यात लक्षणीय यश प्राप्त केले आहे. ही सिस्टिम पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे. प्रत्येक भारतीयाला त्याच्या-त्याच्या भाषेत हा मेसेज पोहोचला. ही निश्चितच लक्षणीय प्रगती आपण केली आहे.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र
वैशिष्ट्ये आणि विकास
स्वदेशी तंत्रज्ञान: ही प्रणाली 'सी-डॉट'-ने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहकार्याने आणि केंद्रीय गृहखात्याच्या मार्गदर्शनाखाली विकसित केली आहे.
तातडीची माहिती : याद्वारे 3 आपत्ती, आणीबाणी आणि सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित महत्त्वाची माहिती काही सेकंदात नागरिकांच्या मोबाइलवर पोहोचवली जाईल.
३ आंतरराष्ट्रीय दर्जा : ही प्रणाली संयुक्त राष्ट्रांच्या 'इंटरनॅशनल टेलिकॉम युनियन'ने शिफारस केलेल्या 'कॉमन अलटिंग प्रोटोकॉल'वर आधारित आहे.