Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 19:58 IST2026-04-19T19:58:07+5:302026-04-19T19:58:07+5:30
सोलापूर जिल्ह्यात ३८ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह मिळाला होता. पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली होती. पण, एका रिपोर्टमुळे व्यक्तीचा मृत्यू नव्हे, तर हत्या झाल्याचे समोर आले.

Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Solapur Crime news: करमाळा तालुक्यातील केम येथील मल्हारी कांबळे यांच्या मृत्यूचे गूढ उलगडले. आधी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केलेल्या पोलिसांनी तपास केल्यानंतर बहिणीनेच हत्या केल्याचे समोर आले. करमाळा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उघड करून दोघा आरोपींना अटक केली आहे.
मृत मल्हारी कांबळे यांची सख्खी बहीण शीतल राजू केंगार (वय ३२) व राजेश बापू केंगार (३०, दोघे रा. केम, ता. करमाळा) यांनीच हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
बहीण-भाऊजी म्हणाले, 'कुणावरही संशय नाही'
१२ एप्रिल रोजी केम येथील मल्हारी पोपट कांबळे (३८) यांचा मृतदेह मिळून आला होता. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. दरम्यान, मृताची बहीण शीतल व भावजी राजेश यांनी मृतास दारूचे व्यसन असल्याचे सांगून कोणावरही संशय नसल्याचे पोलिसांना सांगितले होते.
पोस्टमार्टेम रिपोर्टमुळे बिंग फुटले
पोस्टमार्टम रिपोर्टमुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. कारण या रिपोर्टमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट केल्याने तपासिक अंमलदार पोपट टिळेकर व पोलिस निरीक्षक रणजित माने यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भा.न्या.सं. कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल केला.
तपासादरम्यान पोनि. रणजित माने यांना शीतल व राजेश केंगार यांच्या हालचालींवर संशय आला. कसून चौकशी केली असता बहीण शीतल हिने कबुली दिली की, भाऊ मल्हारी रोज दारू पिऊन माझ्यासोबत भांडण करायचा, 'तुम्ही येथून निघून जा' असे म्हणायचा. त्यामुळे वैतागले होते.
शीतलने ओढणीनेच आवळला गळा
११ एप्रिल रोजी भाऊ मल्हारी नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला. भांडण करू लागला.. रागाच्या भरात शीतलने ओढणीने भावाचा गळा आवळला. त्यावेळी शीतलचा पती राजेश केंगार तेथे आला.
त्याला हा सर्व प्रकार सांगितल्यानंतर दोघांनी मिळून प्रेत दोघांचे खांद्यावर घेऊन रानारानातून जाऊन दत्तात्रय देवकर यांच्या विहिरीच्या भरावाच्या कडेला असलेल्या मकवानाच्या गंजीच्या आडोशाला टाकून दिले. गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी शीतल केंगार व राजेश बापू केंगार यांना अटक केली आहे.