नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 20:56 IST2026-04-19T20:55:44+5:302026-04-19T20:56:46+5:30
मध्य प्रदेशातील सिवनी येथे एका पतीने आपल्या पत्नीचे प्रेम मान्य करत तिला प्रियकरासोबत राहण्याची संमती दिली.

AI Generated Image
म्हणतात ना, 'प्रेम आंधळं असतं', पण जेव्हा हेच प्रेम लग्नानंतर दुसऱ्या व्यक्तीवर जडतं, तेव्हा संसाराचा खेळखंडोबा व्हायला वेळ लागत नाही. मात्र, मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात एक अशी घटना घडली आहे, ज्याची सध्या संपूर्ण राज्यात चर्चा होत आहे. आपल्या पत्नीचं दुसऱ्यावर प्रेम आहे हे समजल्यानंतर, पतीने राडा न घालता चक्क तिला तिच्या प्रियकराच्या हाती सोपवून एक वेगळाच प्रकार केला आहे.
लग्नानंतर अवघ्या काही महिन्यात फुटलं प्रेमाला धुमारे
मिळालेल्या माहितीनुसार, सिवनी जिल्ह्यातील केवळारी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या अहरवाडा गावात ही घटना घडली. येथील रहिवासी शशांक लखेरा यांचा विवाह एप्रिल २०२४ मध्ये अपूर्वा नावाच्या तरुणीशी झाला होता. संसाराची स्वप्ने रंगत असतानाच, अपूर्वाचे त्याच गावातील जयदीप तिवारी नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध निर्माण झाले. लग्नानंतरही हे दोघे एकमेकांच्या संपर्कात होते आणि त्यांच्या भेटीगाठी सुरूच होत्या.
समजुतीचे सर्व प्रयत्न ठरले निष्फळ
पत्नीच्या या वागण्यामुळे शशांक आणि त्यांच्या कुटुंबात काही काळ तणावाचे वातावरण होते. समाज आणि नातेवाईकांनी अपूर्वाचे मन वळवण्याचा अनेकदा प्रयत्न केला. तिला संसाराचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न झाला, मात्र अपूर्वा आपल्या निर्णयावर ठाम होती. तिला जयदीपसोबतच राहायचे होते. अखेर हे प्रकरण केवळारी पोलीस ठाण्यात पोहोचले.
पोलीस ठाण्यात झाला हायव्होल्टेज ड्रामा
१७ एप्रिल रोजी केवळारी पोलीस ठाण्यात पती, पत्नी आणि प्रियकर हे तिघेही आमनेसामने आले. यावेळी अपूर्वाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, तिचे जयदीपवर प्रेम आहे आणि तिला त्याच्यासोबतच आयुष्य जगायचे आहे. यावर पतीने कोणताही गोंधळ न घालता मोठे मन दाखवले. शशांकने पोलिसांना लेखी अर्ज देऊन सांगितले की, पत्नीला तिच्या इच्छेनुसार प्रियकरासोबत जाण्यास माझी कोणतीही हरकत नाही.
प्रियकरानेही घेतली जबाबदारी
यावेळी केवळ पत्नी आणि पतीनेच नाही, तर प्रियकर जयदीप तिवारी यानेही लेखी हमी दिली. "मी अपूर्वाचा पत्नी म्हणून स्वीकार करीन आणि तिला सुखात ठेवीन," असे त्याने आपल्या अर्जात नमूद केले. तिन्ही पक्षांच्या संमतीनंतर पोलिसांनी हे प्रकरण 'आपसी सहमती' म्हणून नोंदवले आहे. सध्या या अनोख्या विवाहाची आणि पतीच्या या निर्णयाची सिवनी जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे. समाजात या घटनेवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, काहींनी पतीच्या संयमाचे कौतुक केले आहे, तर काहीजण या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त करत आहेत.