"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 11:02 IST2026-05-07T10:58:39+5:302026-05-07T11:02:00+5:30
Husband Viral Video: महानगरांमध्ये राहत असताना वाटत राहणारी असुरक्षितता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशातील काही शहरांमध्ये सुरक्षित वातावरण चिंतेचा विषय बनत आहे, तर काही शहरे लोकांना सुरक्षित वाटतात; हा मुद्दा एका व्हिडीओमुळे पुन्हा चर्चेत आला आहे.

"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
Women Safaty: दिल्ली देशाची राजधानी पण असुरक्षितता, प्रदूषण यामुळे सतत चर्चेत असते. अशातच दिल्लीत जन्मल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीच्या व्हिडीओने लक्ष वेधून घेतलंय. ३० वर्षे दिल्लीत राहिल्यानंतर हा व्यक्ती हैदराबादमध्ये राहायला आला. त्याच्या आयुष्यात जे बदल घडले, ते त्याने सगळ्यांसोबत शेअर केले आहेत. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्याने दिल्लीत सतत भीती आणि काळजी वाटत राहायची पण, हैदराबादमध्ये आल्यानंतर या गोष्टी संपल्या असे म्हटले आहे.
पर्व शर्मा असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ३० वर्षे दिल्लीत राहिल्यानंतर शहर बदलले. हैदराबादला राहायला आल्यानंतर आयुष्य कसे बदलले, याबद्दल त्याने सांगितले आहे.
दिल्लीत नेहमी अलर्ट रहावं लागायचं
३० वर्षे दिल्लीत राहिल्यानंतर मी कामामुळे दोन वर्षापूर्वी माझ्या पत्नीसह हैदराबादला आलो. माझी मनस्थिती आणि सुरक्षितेतबद्दलची भावना पूर्णपणे बदलून गेली आहे, असे पर्व शर्माने म्हटले आहे.
"दिल्लीत राहत असताना नेहमी मनात एक भीती असायची आणि सतर्क राहावं लागायचं. रस्त्यावरून चालताना मोबाईलचा वापर करणे असो किंवा दागिने घालून बाहेर पडणे असो. प्रत्येकवेळी चोरी होण्याचा किंवा हिसकावून घेण्याची भीती वाटत राहायची", असे पर्व शर्माने म्हटले आहे.
"जेव्हा केव्हा घरातील महिला रात्रीच्या वेळी बाहेर जायच्या, तेव्हा कुटुंबातील लोक त्यांचे लोकेशन बघत राहायचे आणि कॉल करून संपर्कात असायचे. हैदराबादमध्ये आल्यानंतर आता ही चिंता हळूहळू संपून गेली आहे", असेही पर्व शर्माने म्हटले आहे.
"आता पत्नी बाहेर गेली काळजी वाटत नाही"
पर्वने म्हटले आहे की, "हैदराबादला आल्यानंतर माझी विचार करण्याची पद्धत आणि आयुष्य दोन्हीही पूर्ण बदलले आहे. आता माझी पत्नी रात्री उशिरा बाहेर गेली, तर मला काळजी वाटत नाही. ती आरामात सगळीकडे फिरते. मला तिच्या सुरक्षिततेची चिंता वाटत नाही."