"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 10:32 IST2026-05-07T10:32:04+5:302026-05-07T10:32:42+5:30
बुधवारी रात्री उशिरा झालेल्या या हत्याकांडाने पश्चिम बंगालमधील राजकारण तापले आहे. भाजपाने ही राजकीय हत्या असल्याचे म्हटले तर टीएमसीने या हत्येची सीबीआय चौकशी करा अशी मागणी केली

"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
कोलकाता - पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात हिंसाचार पसरला आहे. या हिंसाचारात आतापर्यंत ५ जणांची हत्या झाली आहे. त्यात भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. संध्याकाळी ६ वाजता चंद्रनाथसोबत अखेरचं बोलणं झाले होते, त्याने निजाम पॅलेसला या, गप्पा मारू, चहा पिऊ आणि भाजपाच्या विजयाचा आनंद साजरा करू असं म्हटलं होते. मात्र आपण आज येऊ शकत नाही, उद्या भेटू असं चंद्रनाथचा मित्र कासिम अली याने सांगितले.
बुधवारी रात्री उशिरा झालेल्या या हत्याकांडाने पश्चिम बंगालमधील राजकारण तापले आहे. भाजपाने ही राजकीय हत्या असल्याचे म्हटले तर टीएमसीने या हत्येची सीबीआय चौकशी करा अशी मागणी केली. सध्या पोलीस या हत्येचा तपास करत आहेत परंतु या संपूर्ण प्रकरणात सर्वाधिक चर्चा कासिम अली याच्या त्या विधानाची होत आहे, ज्यात त्याने चंद्रनाथ रथ याच्यासोबत झालेले अखेरचे बोलणे सर्वांना सांगितले. बुधवारी संध्याकाळी ६ ते ६.३० मध्ये चंद्रनाथ रथसोबत कासिमचे बोलणे झाले होते. त्याने भेटायला बोलावले परंतु मी जाऊ शकलो नाही. वातावरण सामान्य होते, कुणालाही काही तासात इतकी मोठी घटना घडेल याचा अंदाज नव्हता असं कासिमने म्हटलं.
नेमकं काय घडलं?
बुधवारी रात्री मध्यमग्राम परिसरात चंद्रनाथ रथ याच्या कारवर हल्ला करण्यात आला. एक कार आणि दुचाकीस्वार त्याच्या चंद्रनाथ याच्या कारचा पाठलाग करत होते. काही अंतरावर जात हल्लेखोरांनी चंद्रनाथ यांची कार रोखली आणि त्यावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्यात चंद्रनाथ रथ याला बऱ्याच गोळ्या लागल्या. त्यानंतर तातडीने त्याला जखमी अवस्थेत हॉस्पिटलला नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात तणाव पसरला. मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते हॉस्पिटलला दाखल झाले. हा हल्ला चंद्रनाथ रथ यांच्यावर नव्हता तर सुवेंदू अधिकारी यांना टार्गेट करायचे होते असा आरोप कासिम अलीने केला. चंद्रनाथ कुठून यायचा, कोणत्या मार्गाने जायचा याची रेकी केली होती असा दावाही त्याने केला. परंतु पोलिसांनी अद्याप त्याची पुष्टी केली नाही.
दरम्यान, चंद्रनाथ रथच्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी. त्यांचा एन्काऊंटर करण्यात यावा. ९ तारखेला सकाळी आमचा मुख्यमंत्री शपथ घेईल त्यानंतर संध्याकाळपर्यंत कारवाई व्हायला हवी हे कासिम अली यांचे विधान सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे. घटनास्थळावरून काडतूस आणि इतर पुरावे गोळा केले जात आहे. सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी होत आहे. ज्या कारचा हल्ल्यासाठी वापर केला गेला तीदेखील पोलिसांनी जप्त केली आहे.