आयपीएलचा यंदाचा हंगाम पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्ससाठी निराशाजनक ठरला आहे. स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या दहा सामन्यांपैकी सात सामन्यांत मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. याचदरम्यान, मुंबई इंडियन्सच्या गोटात सारं काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहे.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध होणाऱ्या लढतीसाठी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या हा संघासोबत रायपूरमध्ये आलेला नाही.
समोर आलेल्या वृत्तानुसार मुंबई इंडियन्सचा संघ जेव्हा विमानतळावर एकत्रित आला तेव्हा त्या संघासोबत हार्दिक पांड्या नव्हता. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना १० मे रोजी खेळवला जाणार आहे. मात्र या लढतीत नियमित कर्णधार हार्दिक पांड्या खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
याआधी लखनौ सुपरजायंट्सच्या संघाविरुद्ध झालेल्या लढतीत हार्दिक पांड्या खेळला नव्हता. पाठदुखीच्या त्रासामुळे हार्दिक पांड्या या सामन्यात खेळला नसल्याचे सांगण्यात आले होते. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्सचं नेतृत्व केलं होतं. तसेच या लढतीत मुंबई इंडियन्सने विजय मिळवून प्लेऑफसाठीचं आपलं आव्हान कायम ठेवलं होतं.