प. बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 12:09 IST2026-05-07T11:17:17+5:302026-05-07T12:09:48+5:30
पश्चिम बंगालमध्ये पराभव झाल्यानंतर टीएमसीने विधानसभेत आणि बाहेर दोन्ही मोर्चांवर रणनीती तयार करण्यासाठी निवडून आलेल्या ८० आमदारांची बैठक बोलावली होती.

प. बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
कोलकाता - पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर घडले आहे. विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी टीएमसीचा दारूण पराभव झाला. त्यानंतर पक्षाने आत्मचिंतन सुरू केले आहे. ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या निवासस्थानी टीएमसी आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीला पक्षाच्या ८० आमदारांपैकी ७० आमदार पोहचले आणि १० आमदार गैरहजर राहिले. त्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदाची निवड करण्यासाठी बोलावलेल्या या बैठकीला आमदारांनी गैरहजेरी लावली त्यामुळे नव्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
पश्चिम बंगालमध्ये पराभव झाल्यानंतर टीएमसीने विधानसभेत आणि बाहेर दोन्ही मोर्चांवर रणनीती तयार करण्यासाठी निवडून आलेल्या ८० आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीतून १० आमदार गायब होते. या आमदारांच्या गैरहजेरीने राजकीय चर्चा रंगत होत्या, त्यात पक्षाने हे १० आमदार वेगवेगळ्या कारणास्तव अनुपस्थित होते असा खुलासा केला. बंगालमध्ये मागील १५ वर्षापासून ममता बॅनर्जी यांची सत्ता होती. परंतु यंदाच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना सत्तेतून हद्दपार करण्यात भारतीय जनता पार्टीला यश आले. भाजपाने २०० हून अधिक जागा जिंकून बंगालमध्ये नवा इतिहास रचला. त्यानंतर राज्यात भाजपा विरुद्ध टीएमसी कार्यकर्ते यांच्यात तणाव निर्माण झाला आहे.
बैठकीत आमदार का पोहचले नाही?
टीएमसीचा दावा आहे की, काही आमदारांना कार्यकर्त्यांच्या मदतीसाठी आपापल्या मतदारसंघात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्य काही मेडिकल इमरजेन्सी आणि खासगी कारणामुळे गैरहजर आहे. परंतु टीएमसी बैठकीतील १० आमदारांच्या गैरहजेरीने सर्वांचे लक्ष वेधले. यावरून सुरू असलेल्या विविध चर्चा टाळण्याचा टीएमसीचा प्रयत्न आहे. भाजपाने विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी केली असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
१० नेत्यांची बनवली टीम
दरम्यान, बैठकीत ममता बॅनर्जी यांनी पक्षातील काही नेत्यांवर आगपाखड केली आहे. आपल्याच काही माणसांनी आपले नुकसान केले आहे असं ममता यांनी म्हटलं. या आरोपाची चौकशी करण्यासाठी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची एक समिती बनवण्यात आली आहे. ही समिती विविध जिल्ह्यांचा दौरा करून पराभवासाठी नेमकी कारणे काय, दोषी कोण आहेत याचा शोध घेणार आहेत.