राज्य सरकारचा विभाग शक्तिपीठ महामार्गाची माहिती देत नाही- राजू शेट्टी यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 11:34 IST2026-05-07T11:33:26+5:302026-05-07T11:34:47+5:30
प्रकल्प अहवाल संबंधित विभागाकडे असणे बंधनकारक असते, असेही ते म्हणाले

राज्य सरकारचा विभाग शक्तिपीठ महामार्गाची माहिती देत नाही- राजू शेट्टी यांचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे महिन्यापासून शक्तिपीठ महामार्गाची माहिती मागविली आहे. आजअखेर त्यांच्याकडून कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. शासनाकडून एखाद्या प्रकल्पाची घोषणा होत असेल तर त्याचा प्रकल्प अहवाल संबंधित विभागाकडे असणे बंधनकारक असते. मात्र रस्ते विकास महामंडळ गेल्या महिनाभरापासून माहिती देत नाही, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रसिद्धीपत्रकातून केला आहे.
पत्रकात म्हटले आहे, प्रकल्पांचे काम खासगी कंपन्यांना दिले आहे. राज्यातील मोठमोठे प्रकल्प व त्या प्रकल्पांचा अहवाल करणाऱ्या खासगी कंपन्यांनी राज्यात उच्छाद मांडला आहे. सर्व प्रकल्पांची कामे मनमानी पद्धतींनी सुरू आहेत. प्रशासनातील चांगले अधिकारी या कारभारामुळे हतबल झाले आहेत. शक्तिपीठ महामार्गातील ज्या काल्पनिक गोष्टी शासनाने मांडल्या आहेत, त्यांबद्दल रस्ते विकास महामंडळास कल्पना नाही, ही गंभीर बाब आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी पुणे-बंगळुरू ग्रीन कॉरिडॉरची घोषणा केली. या महामार्गाचा प्रतिकिलोमीटर खर्च ५१ कोटी रुपये आहे. शक्तिपीठ महामार्गाचा प्रतिकिलोमीटर खर्च ११७कोटी रुपये इतका होणार आहे. याचाच अर्थ या प्रकल्पातून ५० हजार कोटींचा ढपला पाडायचा डाव आहे. म्हणूनच महिन्यापासून माहिती दिली जात नाही.