पोलिस बनून येतो म्हणाला..; मृत्यूची बातमी थडकली, ३०० मीटर अंतर बाकी असताना कोसळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 13:01 IST2026-02-22T13:01:03+5:302026-02-22T13:01:46+5:30
संग्रामचं वाक्य वडिलांच्या कानात घुमतंय...

पोलिस बनून येतो म्हणाला..; मृत्यूची बातमी थडकली, ३०० मीटर अंतर बाकी असताना कोसळला
नितीन पाटील/ पलूस: पोलिस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून जिवाच्या आकांताने धावलेल्या संग्राम धोंडिराम शिंदे (वय २४. रा. मोराळे, ता. पलूस जि. सांगली) या तरुणाचा पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीदरम्यान मृत्यू झाला. शनिवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या गोकुळ मैदानावर लोहमार्ग भरती प्रक्रियेत ही दुर्दैवी घटना घडली. विशेष म्हणजे, १६०० मीटरचा चौथा राऊंड पूर्ण होत असतानाच फिनिशिंग लाईनच्या जवळ असताना संग्राम जमिनीवर कोसळून मृत्युमुखी पडला.
पुण्यातून त्यादिवशी मोराळेच्या घरी वडिलांना कॉल आला.. आप्पा छत्रपती संभाजीनगरला चाललोय पोलिस भरतीला. काळजी करू नका. निकाल लागला की कळवतो. तरुण मुलाचं हे वाक्य अन त्याचा आवाज घरच्यांसाठी शेवटचाच ठरला. भरतीसाठी धावताना त्याचा स्वप्न साकारण्यासाठी सुरू असलेला संग्रामही थांबला होता. मुलाच्या मृत्यू वार्ताने हादरलेल्या वडिलांच्या कानात त्याचा आवाज आजही घुमत होता. शेतातल्या बांधावर नियंत्रण असणाऱ्या सामान्य शेतकऱ्याच्या अश्रूचा फुटलेला बांध मात्र या घटनेने नियंत्रणाबाहेर गेला.
मोराळे (ता पलूस) येथील तरुणाच्या अधुऱ्या कहाणीने संपूर्ण महाराष्ट्र शनिवारी हादरून गेला. शेतकरी असलेल्या धोंडीराम शिंदे यांच पोरग संग्राम (वय २४) उच्चशिक्षित झाल. एम्.एस्सी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये डेंटल विभागात त्याला महिनाभरापूर्वीच नोकरी लागली होती. नोकरी करताना शासकीय नोकरीचे स्वप्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं. पोलिस भरतीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून त्याने अहोरात्र मेहनत व व्यायाम सुरू केला.
पोलीस भरती होऊन पुढे अधिकारी बनायचं हे स्वप्न उराशी बाळगलेल्या संग्रामचे स्वप्न मैदानावर लढताना भंगलं जाईल याचा कुटुंबीयांनी स्वप्नातही विचार केला नव्हता. छत्रपती संभाजीनगर येथे शनिवारी तो मैदानात उतरला. दोन राउंड पूर्ण केले व शेवटच्या राऊंडमधील अवघ्या 300 मीटर अंतर बाकी असताना तो मैदानात कोसळला.
संकटांनी घेरलेलं कुटुंब
ऊसतोडणी वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्या वडिलांचे दोन विवाह झाले. दुसऱ्या पत्नीचा संग्राम एकुलता एक मुलगा होता. वडिलांचे तीन ट्रॅक्टर होते. मात्र तोडणी मजूर व मुकादम यांनी फसवणूक केल्याने हे कुटुंब आर्थिक संकटात होते. याची जाणीव झालेल्या संग्रामने शासकीय अधिकारी बनण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तो अभ्यास व्यायाम करत होता.