ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
By प्रज्ञा म्हात्रे | Updated: May 17, 2026 21:28 IST2026-05-17T21:27:58+5:302026-05-17T21:28:51+5:30
Thane News: १४ मे रोजी मिठबंदर खाडी परिसरात एक व्यक्ती पडल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली होती

ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मिठबंदर खाडीत पडलेल्या व्यक्तीच्या शोधासाठी गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले शोधकार्य अखेर थांबवण्यात आले. स्थानिक मच्छीमार, आपत्ती व्यवस्थापन विभाग, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल आणि पोलिस प्रशासनाने सलग अनेक तास बोटींच्या सहाय्याने शोधमोहीम राबवली, मात्र संबंधित व्यक्तीचा कोणताही ठावठिकाणा लागला नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.
१४ मे रोजी मिठबंदर खाडी परिसरात एक व्यक्ती पडल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला प्राप्त झाली होती. त्यानंतर तातडीने शोधकार्य सुरू करण्यात आले. शनिवारी १६ मे रोजी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, कोपरी पोलीस कर्मचारी, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान आणि ठाणे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने बोटींच्या सहाय्याने मिठबंदर खाडीत सुमारे पाच तास शोधकार्य करण्यात आले. अंधार आणि भरतीमुळे शोधकार्य काही काळासाठी थांबवून रविवारी सकाळी पुन्हा सुरू करण्यात आले. रविवारी १७ मे रोजीही आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, कोपरी पोलीस, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी उपस्थित होते. दोन बोटींच्या सहाय्याने खाडी परिसरात तब्बल सहा तास शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र सर्व प्रयत्नांनंतरही बेपत्ता व्यक्तीचा शोध लागू शकला नाही.
चार दिवस सातत्याने सुरू असलेल्या या शोधकार्यात प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले. अखेर कोणताही मागमूस न लागल्याने शोधकार्य थांबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.