ज्या द्राक्षबागेवर जिवापाड प्रेम केलं त्याच ठिकाणी प्रतापरावांनी जीवन संपवलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 11:07 IST2026-03-20T11:06:50+5:302026-03-20T11:07:35+5:30
लहरी हवामानानं उद्धवस्त केलं प्रगतशील शेतकऱ्याचं स्वप्न

AI Generated Image
वैभव केंगार
लोकमत न्यूज नेटवर्क
कवठेमहांकाळ : बागेत डोलणाऱ्या हिरव्यागार द्राक्षमण्यांसोबत आर्थिक प्रगतीच्या पायऱ्या चढत मळणगावच्या शेतकऱ्याने अनेक स्वप्नं रंगवली... ओंजळीत ज्या निसर्गानं भरभरुन दान दिलं त्यानंच नंतर सारं हिसकावून घेतलं. हिरव्या बागेला काळ्या छायेत जाताना पाहून त्यांचं मन सुन्न झालं. कर्जाचा डोईवरचा भारही वाढत गेला. शेतातल्या ज्या आंब्याच्या झाडाखाली कधी समाधानाचा घास घेतला होता त्याच झाडावर त्यांनी गळफास घेतला अन् अखेरचा श्वासही.
मळणगावच्या शिवारात मंगळवारची सकाळ उगवली, पण यावेळी नेहमीची लगबग नव्हती. वातावरणात एक स्मशान शांतता होती. काही क्षणांतच ती शांतता काळजाला भिडणाऱ्या वेदनेत बदलली आणि गावाने एका कष्टकरी शेतकऱ्याला कायमचे गमावले. प्रतापराव श्रीपतराव शिंदे..हे नाव गावात आदरानं घेतलं जायचं. मनमिळाऊ, शांत स्वभाव आणि प्रगतशील द्राक्षबागायतदार म्हणून त्यांची ओळख होती. तीन एकरात उभी केलेली द्राक्षबाग म्हणजे त्यांचं विश्व होतं. दिवस-रात्र मेहनत करून त्यांनी ही बाग उभी केली होती. आधुनिक पद्धतींचा अवलंब, योग्य व्यवस्थापन, वेळोवेळी केलेली निगा या सगळ्यामुळे ते प्रगतशील शेतकरी म्हणून गावात आदर्श मानले जात होते. याच बागेने त्यांच्या संसारात सुखाचे क्षण फुलविले. मुलांच्या उच्च शिक्षणाच्या वाटा तयार केल्या.
सारं सुरळीत सुरु असतानाच निसर्गाने त्यांची साथ सोडली. कधी अवकाळी पाऊस, कधी द्राक्षबागेवर रोगराई, तर कधी अनियमित तापमान या सगळ्यांनी त्यांच्या बागेवर मोठा परिणाम केला. त्यामुळे विकास सोसायटी व बँकेकडून काढलेल्या कर्जाचा बोजा वाढला. आर्थिक विवंचनेतून त्यांनी जीवन संपविण्याचा निर्णय घेतला.
जुने फेडण्यासाठी नवे कर्ज
सोसायटी व अन्य जुने कर्ज फेडण्यासाठी प्रतापरावांनी एका बँकेतून कर्ज घेतले. बँकेच्या हप्त्याचा ताण वाढला. आर्थिक गणित बिघडलं. उत्पन्नाचे पारडे खाली अन् खर्च, कर्जाचे पारडे वर गेले.
स्वतःच्या हाताने बाग तोडलीतीन एकर द्राक्षबागेला यंदा द्राक्षे लागलीच नाहीत. वर्षभर केलेली मेहनत, घातलेला खर्च, केलेली धडपड सगळं वाया गेलं. शेवटी निराश होऊन त्यांनी स्वतःच्या हाताने उभी केलेली बाग तोडून टाकली. ज्या बागेसाठी आयुष्य वेचले तीच बाग संपवावी लागल्याने ते खचले.
मुलांना अधिकारी झालेलं पहायचं होतं
मुलगा इचलकरंजी येथे अभियांत्रिकी शिक्षण घेत आहे तर मुलगी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. त्यांच्या भविष्यासाठी प्रतापरावांनी अनेक स्वप्ने पाहिली होती. त्यांना अधिकारी झालेलं पहायचं होतं. पण हे स्वप्न भंगलं. पत्नी अन् मुलांची त्यांची साथ सुटली.