सांगली जिल्ह्यात पहिला पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरु, ४.८० कोटींचा टंचाई आराखडा तयार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 19:16 IST2026-05-15T19:15:00+5:302026-05-15T19:16:31+5:30
सध्या एक टँकर, सात विहिरींद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा

संग्रहीत छाया
सांगली : आटपाडी तालुक्यातील पिंपरी खु. येथे या उन्हाळ्यात जिल्ह्यातील पहिला पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्यात आला आहे. तसेच सात विहिरी व कूपनलिकांद्वारे खानापूर आणि शिराळा तालुक्यातील पाच गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. भविष्यात टंचाई आणखी तीव्र होऊ नये, म्हणून जिल्हा प्रशासनाने ४ कोटी ८० लाख रुपयांचा टंचाई आराखडा तयार करून त्यास मंजुरी दिली आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय येवले म्हणाले की, जिल्ह्यात पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यात एकूण ६६ टँकर तसेच १२६ विहिरींचे अधिग्रहण व नऊ विंधन विहिरी घेण्यात येणार आहेत. या उपाययोजनांसाठी सुमारे ४ कोटी ८० लाख ४८ हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात एक टँकर व सात विहिरी / कूपनलिकेद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
ग्रामीण भागात नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी मागणीनुसार आणि आवश्यकतेनुसार टँकर सुरू करणे तसेच विहिरींचे अधिग्रहण करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सध्या खानापूर तालुक्यातील रेवणगाव आणि ऐनवाडी येथे प्रत्येकी दोन कूपनलिका अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. तसेच शिराळा तालुक्यातील बांबवडे येथे एक कूपनलिका तर करमाळे येथे एक कूपनलिका आणि एक विहीर अधिग्रहित करण्यात आली आहे. अशा प्रकारे एकूण सात कूपनलिका आणि विहिरींचे अधिग्रहण केले आहे. आटपाडी तालुक्यातील पिंपरी खु. (चव्हाण वस्ती) येथे एक शासकीय टँकर सुरू केला आहे.