रत्नागिरी जिल्ह्यातील पूरबाधित गावांवर आरोग्य विभागाचे लक्ष, २४ तास राहणार आरोग्य पथके कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 13:41 IST2026-05-16T13:40:55+5:302026-05-16T13:41:38+5:30

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध साथ रोगांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सतर्क 

Health department attention on flood affected villages in Ratnagiri district, health teams will remain operational 24 hours a day | रत्नागिरी जिल्ह्यातील पूरबाधित गावांवर आरोग्य विभागाचे लक्ष, २४ तास राहणार आरोग्य पथके कार्यरत

रत्नागिरी जिल्ह्यातील पूरबाधित गावांवर आरोग्य विभागाचे लक्ष, २४ तास राहणार आरोग्य पथके कार्यरत

रहिम दलाल

रत्नागिरी : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध साथ रोगांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. त्यासाठी २४ तास आरोग्य पथके कार्यरत राहणार असून, जिल्ह्यातील ३० पूरबाधित गावांसह साथ उद्रेक झालेल्या गावांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांना पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

पावसाळ्याच्या दिवसात डेंग्यू, गोवर, हिवताप, गॅस्ट्रो, कावीळ यासारखे साथरोग उद्भवतात. या साथरोगांना आळा घालण्यासाठी साथरोग नियंत्रण, नैसर्गिक आपत्ती व पूरस्थिती नियंत्रण कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात गावांची यादी तयार करण्यात आली आहे. जिल्ह्यात पूर परिस्थिती उद्भवणाऱ्या गावांतही उपाययोजना केल्या जात आहेत.

दरवर्षी पावसाळ्यात व पावसाळ्यानंतर जलजन्य व कीटकजन्य आजारांच्या साथी पसरतात. पावसाळ्यात पाण्याचे स्रोत दूषित होतात. त्यामुळे गॅस्ट्रो, अतिसार, कॉलरा, विषाणूजन्य कावीळ विषमज्वर आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. ठिकठिकाणी पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होऊन हिवताप, डेंग्यूसारखे आजार वाढतात. त्यामुळे या आजारांना आळा घालण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण करावे, सर्वेक्षणाच्या काळात नागरिकांना साथरोगांबाबत मार्गदर्शन करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

नागरिकांना सूचना

पावसाळ्यात साथरोग होऊ नयेत, यासाठी नागरिकांनी पिण्याचे पाणी गाळून व उकळून प्यावे, पिण्याचे पाणी झाकून ठेवावे, उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे आणि माशा बसलेले अन्नपदार्थ खाऊ नयेत, उघड्यावर शौचास बसू नये अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

साथरोग नियंत्रण कक्ष

आरोग्य केंद्रात साथरोग नियंत्रण औषध कीट देण्यात आले आहे. या कीटमध्ये विविध प्रकारची औषधे आहेत. जिल्हा परिषद मुख्यालय, तालुकास्तरावर, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात साथरोग नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यात आरोग्य पथके कार्यरत ठेवण्यात येणार आहेत. त्यांच्याद्वारे गावांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

पूरबाधित गावांची तालुकानिहाय संख्या

तालुका -  गावांची संख्या
खेड  -  २
गुहागर  -  २
चिपळूण  -  ५
संगमेश्वर -  ८
रत्नागिरी   -  ६
लांजा -   १
राजापूर -  ७

गेल्या पाच वर्षात उद्भवलेले आजार

तालुका - साथग्रस्त गाव - साथरोगाचा प्रकार
चिपळूण -  खेर्डी  - डेंग्यू
गुहागर - अडूर  - अन्न विषबाधा
दापोली  - आसूद -  डेंग्यू
रत्नागिरी  -  पावस  - डेंग्यू

  • एकूण लोकसंख्या - १५,६९,९३९
  • ग्रामीण लोकसंख्या - १२,७९,८४२
  • पूरबाधित लोकसंख्या - १,०८,६०१
  • पूरबाधित कुटुंबे - २९,७२१
  • आरोग्य पथकातील कर्मचारी- २३१
  • पूरबाधित गावांमधील ट्रान्झिट आरोग्य पथके - ३३

Web Title : रत्नागिरी जिले के बाढ़ प्रभावित गांवों पर स्वास्थ्य विभाग का ध्यान

Web Summary : बाढ़ प्रभावित रत्नागिरी में स्वास्थ्य विभाग सतर्क है। 24 घंटे स्वास्थ्य दल 30 गांवों पर निगरानी रखेंगे। स्वास्थ्य केंद्रों पर पर्याप्त दवा उपलब्ध है। नागरिकों को बीमारियों से बचने के लिए उबला पानी पीने और सड़क किनारे के भोजन से बचने की सलाह दी जाती है।

Web Title : Health Department Focuses on Flood-Affected Villages in Ratnagiri District

Web Summary : Ratnagiri's health department is on alert due to potential outbreaks in flood-hit villages. 24/7 health teams will monitor 30 villages. Adequate medicine stocks are available at health centers. Citizens are advised to drink boiled water and avoid street food to prevent disease.