लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 23:26 IST2026-05-16T23:26:09+5:302026-05-16T23:26:55+5:30
Union Minister Bandi Sanjay Kumar Son News: केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे.

लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
Union Minister Bandi Sanjay Kumar News: केंद्रीय गृह राज्य मंत्री बंदी संजय कुमार यांचा मुलगा भगीरथ पोलिसांना शरण आला आहे. एका POCSO प्रकरणात पोलिसांनी भगीरथ यांच्या विरोधात लुक-आऊट नोटीस जारी केली होती. यानंतर भगीरथ याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. सायबराबाद पोलिसांनी नोंदवलेल्या एका गुन्ह्याप्रकरणी, पोलिसांनी भगीरथ विरोधात भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
एका १७ वर्षीय मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत आरोप करण्यात आला आहे की, भागीरथ याचे मुलीसोबत अनैतिक संबंध होते आणि त्याने तिच्यावर अत्याचार केले. दुसरीकडे भगीरथ याने पोलिसांकडे उलट तक्रार दाखल केली. तक्रारीत आरोप केला की, त्या मुलीने आणि तिच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी दबाव टाकला आणि नकार दिल्यास खोटे आरोप दाखल करण्याची धमकी दिली. त्याने असाही दावा केला आहे की, दबावाखाली त्यांना ५० हजार रुपये दिले आणि नंतर त्याच्याकडून ५ कोटी रुपये मागण्यात आले.
केंद्रीय मंत्री बंदी संजय कुमार यांचे म्हणणे काय?
मुलाने आत्मसमर्पण केल्यानंतर बंदी संजय कुमार यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, ते कायद्याचा पूर्ण आदर करतात. त्यांच्या मुलाला तपासासाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सर्व नागरिक कायद्यासमोर समान आहेत आणि प्रत्येकाने कायद्याचे पालन केले पाहिजे. तक्रार दाखल झाल्यानंतर लगेचच मुलाला पोलिसांच्या ताब्यात देण्याचा त्याचा मानस होता, परंतु कायदेशीर सल्ला आणि पुराव्यांच्या मूल्यांकनामुळे या प्रक्रियेला विलंब झाला. त्यांचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि न्यायालयाच्या आदेशाची वाट न पाहता त्यांनी आपल्या मुलाला तपासासाठी स्वेच्छेने पोलिसांच्या ताब्यात दिले, असे बंदी संजय कुमार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता के. कविता यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून निष्पक्ष चौकशी होण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना त्यांच्या पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. तत्पूर्वी तेलंगण उच्च न्यायालयाने आरोपीला अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.