पुण्याहून सुटल्यानंतर वंदे भारत रेल्वेत बिघाड; २ तास भर उन्हात उभं राहून प्रवाशांचा मनस्ताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 10:19 IST2026-05-06T10:19:04+5:302026-05-06T10:19:38+5:30
दरम्यान, नीरा रेल्वे स्थानकाच्या पुढे गेल्यावर पॅन्टोग्राफमध्ये बिघाड झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित होऊ लागला. त्यामुळे काही वेळ वंदे भारत थांबविण्यात आली.

पुण्याहून सुटल्यानंतर वंदे भारत रेल्वेत बिघाड; २ तास भर उन्हात उभं राहून प्रवाशांचा मनस्ताप
पुणे: रेल्वेला ओव्हरहेड केबलमधून पॅन्टोग्राफ या उपकरणाद्वारे वीजपुरवठा केला जातो. मात्र पुण्यावरून हुबळीला जाणाऱ्या ‘वंदे भारत’च्या पॅन्टोग्राफमध्ये बिघाड झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे पुण्यावरून सुटल्यानंतर निरा रेल्वे स्थानकाच्या पुढे गेल्यावर दोन तास वंदे भारत थांबविण्यात आली. याचा मनस्ताप रेल्वे प्रवाशांना सहन करावा लागला.
गेल्या आठवड्यातही मुंबईवरून सोलापूरला जाणारी वंदे भारत एक्सप्रेसपुणे रेल्वे स्थानकावर घसरली होती. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यात सोमवारी दुपारी देखील हुबळीला जाणारी वंदे भारत नियमित वेळेनुसार दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी पुणे स्थानकावरून हुबळीकडे निघाली. दरम्यान, नीरा रेल्वे स्थानकाच्या पुढे गेल्यावर पॅन्टोग्राफमध्ये बिघाड झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित होऊ लागला. त्यामुळे काही वेळ वंदे भारत थांबविण्यात आली. परंतु झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी तब्बल दोन तास वेळ लागला. त्यामुळे भर उन्हात प्रवाशांना थांबावे लागले. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून तत्काळ दखल घेऊन झालेला बिघाड दुरुस्त करून वंदे भारत पुढे पाठवण्यात आली, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.