“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 17:27 IST2026-05-06T17:23:55+5:302026-05-06T17:27:32+5:30
Raghav Chadha News: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे थेट 'आयएसआय'चे नरेटिव्ह पुढे नेत आहेत, असा दावा राघव चड्ढा यांनी केला आहे.

“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
Raghav Chadha News: गेल्या काही तासांत पंजाबमध्ये दोन बॉम्बस्फोट झाले आहेत. एक जालंधरमध्ये आणि दुसरा अमृतसरमध्ये. आम्ही याचा तीव्र शब्दांत निषेध करतो. परिस्थिती अत्यंत संवेदनशील आणि चिंताजनक आहे; हे बॉम्बस्फोट म्हणजे पंजाबची शांतता आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा एक स्पष्ट प्रयत्न आहे. पंजाबच्या पोलीस महासंचालकांनी घटनास्थळी भेट देऊन आणि न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या मदतीने सखोल तपास केल्यानंतर, आपल्या प्राथमिक निष्कर्षात असे नमूद केले आहे की, या घटनेमागे पाकिस्तानची ISI ही गुप्तचर संस्था आहे, असे अलीकडेच भाजपात आलेल्या राघव चड्ढा यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर निशाणा साधत काही प्रश्न केले आहेत.
पंजाबमधील जालंधर आणि अमृतसरमध्ये झालेल्या दोन भीषण स्फोटांनी संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. पंजाबमध्ये तीन तासांच्या अंतराने दोन मोठे स्फोट झाले. जालंधरमध्ये बीएसएफ पंजाब फ्रंटियर मुख्यालयाबाहेर उभ्या असलेल्या एका डिलिव्हरी बॉयच्या स्कूटीमध्ये जोरदार स्फोट झाला. सीसीटीव्हीमध्ये एक संशयित व्यक्ती वस्तू ठेवताना दिसत आहे. या स्फोटात बीएसएफचा एक अधिकारी जखमी झाला. जालंधरनंतर काही वेळातच अमृतसरच्या 'खासा' येथील लष्करी छावणी परिसरात दुसरा स्फोट झाला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही, मात्र लष्करी तळाजवळ स्फोट झाल्याने यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. यावरून राघव चड्ढा यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
पाक 'आयएसआय'ला क्लीन चिट देण्यास इतके उत्सुक का?
पंजाबचे मुख्यमंत्री मात्र असा दावा करत आहेत की, या घटनेमागे पाकिस्तानची 'आयएसआय' नसून, भाजपा आहे. त्यामुळे, मला थेट असा प्रश्न विचारायचा आहे की, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे पाकिस्तानच्या 'आयएसआय'ला क्लीन चिट देण्यास इतके उत्सुक का आहेत? भाजपाशी असलेले त्यांचे वैमनस्य इतके पराकोटीला पोहोचले आहे का, की त्यांना आता जाऊन पाकिस्तानच्या 'आयएसआय'च्या मांडीवर बसावे लागत आहे?, अशी विचारणा राघव चड्ढा यांनी केली आहे.
भगवंत मान 'आयएसआय'चीच री ओढत आहेत
आपण अनेकदा असे पाहतो की, जेव्हा 'आयएसआय' एखादा हल्ला घडवून आणते, तेव्हा ती स्वतःला त्यापासून अलिप्त ठेवते; हा एक खोटा बनाव होता आणि आपला याच्याशी काहीही संबंध नाही, असा दावा करते. पण आज भगवंत मान हे थेट 'आयएसआय'चे नरेटिव्ह पुढे नेत आहेत. आयएसआय जे म्हणते, त्याचीच री मान ओढत आहेत; आणि ही बाब अत्यंत धोकादायक आहे. मी मुख्यमंत्र्यांना अशी विनंती करेन की, त्यांनी पाकिस्तानविषयीचा आपला अवाजवी स्नेह बाजूला सारून पंजाबमधील परिस्थितीचे वास्तववादी आकलन करावे आणि तिथे कायदा व सुव्यवस्था पूर्ववत करण्याच्या दिशेने काम करावे. अशा प्रकारची बेजबाबदार विधाने करण्यापेक्षा त्यांनी या तपासाला तार्किक निष्कर्षापर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करावेत आणि आपल्या राज्यातील जनतेला विश्वासात घ्यावे, असे आवाहन राघव चड्ढा यांनी केले.
#WATCH | Delhi: On the incident of twin explosions in Punjab, Rajya Sabha MP Raghav Chadha says, "In the past few hours, two bomb blasts have occurred in Punjab—one in Jalandhar and the other in Amritsar. We condemn this. The situation is very sensitive and worrying, and these… pic.twitter.com/is7xXgY7pI
— ANI (@ANI) May 6, 2026