वर्षानुवर्षांची परंपरा मोडून पुण्यातील मुक्काम बदलण्याच्या चर्चा; पालखी सोहळ्याबाबत मुख्यमंत्री लक्ष घालणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 20:18 IST2026-04-29T20:17:36+5:302026-04-29T20:18:47+5:30
मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासन व संबंधितांशी चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्याचे रासने यांनी सांगितले

वर्षानुवर्षांची परंपरा मोडून पुण्यातील मुक्काम बदलण्याच्या चर्चा; पालखी सोहळ्याबाबत मुख्यमंत्री लक्ष घालणार
पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी येण्याची वर्षानुवर्षांची परंपरा मोडून मुक्कामाचे ठिकाण बदलण्याच्या चर्चा सुरू आहेत. यामुळे नागरिकांमध्ये व वारकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आता हा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष घालणार आहेत. या संदर्भात कसब्याचे आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी येण्याची वर्षानुवर्षांची परंपरा आहे. ही परंपरा पुणेकरांसाठी अत्यंत भावनिक आणि महत्त्वाची आहे. मात्र, सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची वाढती संख्या आणि उपलब्ध सुविधा लक्षात घेता मुक्कामाचे ठिकाण बदलण्याचा विचार सुरू आहे. यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. ही परंपरा अखंड सुरू राहावी, यासाठी आ. रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासन व संबंधितांशी चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्याचे रासने यांनी सांगितले.