हंडाभर पाण्यासाठी जीव मुठीत घेऊन दरीत उतरावं लागतं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 18:02 IST2026-05-15T18:01:52+5:302026-05-15T18:02:47+5:30
- आंबेगावच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यात भीषण पाणीटंचाई; महिलांची दररोज मृत्यूशी झुंज

हंडाभर पाण्यासाठी जीव मुठीत घेऊन दरीत उतरावं लागतं...
तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील महिलांच्या जीवनाची जणू वास्तव कहाणी बनली आहे. भीमाशंकर, पाटण आणि आहुपे खोऱ्यातील दुर्गम गावांमध्ये पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले असून, हंडाभर पाण्यासाठी महिलांना तीन ते चार मैल जीव मुठीत घेऊन डोंगरदऱ्यांतून खडतर पायपीट करावी लागत आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यातील कोंढवळ, आहुपे, बालवीरवाडी, तळेघर, जांभोरी, फलोदे, राजपूर यासह अनेक गावांमध्ये पिढ्यान्पिढ्या दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. यंदा पावसाने लवकरच काढता पाय घेतल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. अनेक गावांमध्ये एकच कुपनलिका असून, त्यातही पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.
कोंढवळ गावातील शिंदेवाडी, उंबरवाडी, कृष्णावाडी, केवळवाडी तसेच इतर वाडीवस्त्यांतील महिलांना पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटर पायी जावे लागते. त्यानंतर अडीचशे ते तीनशे फूट खोल दरी उतरून झऱ्याजवळून हंडाभर पाणी भरावे लागते. पुन्हा तेवढीच चढण चढत डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन परतताना महिलांची अक्षरशः दमछाक होत आहे.
हंडाभर पाण्यासाठी रात्रभर नंबर लावावा लागत असून, दुसऱ्या दिवशीच पाणी मिळत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. पाय घसरला तर थेट खोल दरीत कोसळण्याचा धोका कायम डोळ्यासमोर असतो. अशा परिस्थितीत महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना जीव धोक्यात घालून पाणी आणावे लागत आहे.
दूषित पाण्यामुळे साथीच्या रोगांचा धोका
डोंगरातील झऱ्यांमधून मिळणारे पाणी दूषित झाल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्याअभावी स्वच्छतेच्या समस्या वाढल्या असून, साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडतो, मात्र उन्हाळ्यात आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते, ही शोकांतिका कायम आहे.
आम्ही जीवन जगायचं तरी कसं?
एकीकडे घोटभर पाणी मिळालं नाही तर मरण, आणि पाणी आणताना दरीत पाय घसरला तरी मरण.. आम्ही जीवन जगायचं तरी कसं? असा हतबल सवाल आसाणे भांगलेवाडी येथील रुख्मिणी भांगले यांनी व्यक्त केला. तर कोंढवळ येथील ज्येष्ठ आदिवासी महिला रखमाबाई वाजे म्हणाल्या, सगळं आयुष्य गेलं, पण डोक्यावरचा हंडा खाली उतरला नाही. पूर्ण दिवस घोटभर पाणी टिपण्यात जातो. आम्हा आदिवासींच्या पाचवीलाच दुष्काळ पूजला आहे.
अनेक गावांमध्ये तीव्र टंचाई
तळेघर, कोंढरे, कुशिरे, माळीण, आमडे, कोंढवळ, राजपूर, फलोदे, फुलवडे तसेच मोहरेवाडी, नंदकरवाडी, गोहे खुर्द, डामसेवाडी, आहुपे, वनदेव, बोरघर, घोडेवाडी, आवळेवाडी, माळवाडी, असाणे, सावरली, गोहे बुद्रुक, सायरखळा, पाचवड आदी अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
उन्हाचा चटका वाढत असताना दुष्काळाच्या झळाही तीव्र होत असून, आदिवासी भागातील महिलांचे जीवन अक्षरशः पाण्यासाठीच्या संघर्षात अडकले आहे. प्रशासनाने तातडीने टँकर, नवीन पाणीपुरवठा योजना आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी आदिवासी बांधवांकडून होत आहे.