भाजपविरोधात लढण्याची हिंमत असेल तरच एकत्रीकरण शक्य; रोहित पवारांचा अजित पवार गटाला थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 09:48 IST2026-05-16T09:48:37+5:302026-05-16T09:48:50+5:30
ज्यावेळी अजित पवार हे अडचणीत होते. त्यावेळी शेळके कधी बोलले नाहीत. सुनील तटकरे जेव्हा अडचणीत येतात. तेव्हा तुम्ही बोलता.

भाजपविरोधात लढण्याची हिंमत असेल तरच एकत्रीकरण शक्य; रोहित पवारांचा अजित पवार गटाला थेट इशारा
पुणे : ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का, या चर्चेत सध्या तथ्य नाही. जर अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामान्य लोकांच्या प्रश्नासाठी भाजपविरोधात लढण्यास तयार असेल, एकत्रीकरण व्हायचे असेल, तरच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतील,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
ते पुण्यात शुक्रवारी (दि.१५) पत्रकारांशी बोलत होते. येत्या १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या उपस्थितीत वरिष्ठ नेत्यांच्या बैठका पार पडल्या. या बैठकांबाबत बोलताना पवार म्हणाले, “बैठकीत संघटनात्मक बदल आणि वर्धापन दिनाचे नियोजन यावर चर्चा झाली असावी. सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली असली, तरी जोपर्यंत भाजपविरोधात लढण्याची भूमिका स्पष्ट होत नाही, तोपर्यंत कार्यकर्त्यांच्या मनातील नाराजी दूर होणार नाही.”
पवार यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. पवार म्हणाले की, ज्यावेळी अजित पवार हे अडचणीत होते. त्यावेळी शेळके कधी बोलले नाहीत. सुनील तटकरे जेव्हा अडचणीत येतात. तेव्हा तुम्ही बोलता.’
अजित पवारांच्या प्रकरणावरून आव्हान
तुम्ही सत्तेत असूनही अजित पवारांवरील सीबीआय केस किंवा एफआयआरबाबत केंद्राकडे पाठपुरावा का करत नाही? नुसते स्मरणपत्र देऊन काही होत नाही. तुमच्यात हिंमत असेल, तर या प्रकरणांचा निकाल लावून दाखवा, असे आव्हान त्यांनी यावेळी दिले.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी त्यांनी जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेत जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत चर्चा केली. निर्धारित कोट्याप्रमाणे पाणी न मिळणे, वहनातील तूट, आवर्तनाचा अपुरा कालावधी, पाणीपट्टी दर, बंद पाईपच्या माध्यमातून योजना कार्यान्वित करणे, गट क्रमांकनिहाय सर्वेक्षण करणे आदी शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. यावर सविस्तर चर्चा झाली आणि या योजनेतील अडचणी सोडविण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. या अडचणी दूर करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बारामती आणि पुरंदरमधील शेतकरी उपस्थित होते.