निरनिमगाव कचरवाडी गावालगत ऐन उन्हाळ्यात नीरा नदीपात्र पडले कोरडेठाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 10:27 IST2026-04-17T10:26:29+5:302026-04-17T10:27:33+5:30
- या बंधाऱ्यावर सुमारे सात किलोमीटर परिसरातील हजारो हेक्टर शेती पिकांचे पाणी अवलंबून आहे.

निरनिमगाव कचरवाडी गावालगत ऐन उन्हाळ्यात नीरा नदीपात्र पडले कोरडेठाक
बावडा : इंदापूर तालुक्याच्या दक्षिण भागातून नीरा नदी वाहते, आणि कचरवाडी (भगतवाडी, ता. इंदापूर) येथील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाणी ऐन उन्हाळ्यात संपल्याने नदीपात्र कोरडे पडले आहे. या बंधाऱ्यावर सुमारे सात किलोमीटर परिसरातील हजारो हेक्टर शेती पिकांचे पाणी अवलंबून आहे.
इंदापूर तालुक्यातील भगतवाडी, निरनिमगाव, पिठेवाडी, सराटी या गावांचा काही भाग, तसेच माळशिरस तालुक्यातील आनंदनगर, कचरवाडी, चाकोरे या परिसरातील शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेती या बंधाऱ्यातून मिळणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहे. सध्या या पात्रातील पाणी संपले आहे, ज्यामुळे या पाण्यावर अवलंबून असलेल्या पिकांना फटका बसणार आहे. साधारणतः फेब्रुवारी ते जुलैदरम्यान नदीपात्र पाण्याअभावी कोरडे राहते. हा प्रश्न शेतकऱ्यांना अनेक वर्षांपासून आहे. मार्च महिन्यात धरणातून पाणी एकदा कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे भरण्यासाठी सोडण्याची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून या नदी परिसरातील शेतकरी व गावकरी करत आहेत. या काळात नीरा नदीलगतच्या हजारो शेतकऱ्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. साधारणतः फेब्रुवारी ते जुलैदरम्यान नदीपात्रात पाणी असल्यास नदीच्या किनारी असलेल्या इंदापूर व माळशिरस तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पिकांना फायदा होऊ शकतो.
त्याबरोबर नदीपात्रातील पाण्यामुळे अनेक गावांतील विंधनविहिरी व विहिरींचे पाणी राहिल्यास या परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई भासणार नाही. पर्यायाने या भागातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईल आणि शासनाचे टँकरचा खर्च देखील लाखोंमध्ये वाचेल. याचा विचार करून शासनाने बुडीत बंधारे किंवा मार्च महिन्यात बंधारे भरण्यासाठी धरणातून पाणी सोडण्याची तरतूद करावी, अशी मागणी या परिसरातील शेतकरी करू लागले आहेत. सध्या या परिसरात ऊस, डाळिंब, पेरू, चारा पिके उभी असून या पिकांसाठी पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे.