Pune Nasrapur Case: 'ज्या ठिकाणी घटना घडली, त्याच ठिकाणी त्याला ठेचून मारलं पाहिजे', नराधमाच्या पत्नीचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 18:41 IST2026-05-04T18:40:53+5:302026-05-04T18:41:50+5:30
Pune Nasrapur Case “तो माझा बाप आहे हीच माझी चूक आहे. त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या,” अशी मागणी मुलाने केली आहे

Pune Nasrapur Case: 'ज्या ठिकाणी घटना घडली, त्याच ठिकाणी त्याला ठेचून मारलं पाहिजे', नराधमाच्या पत्नीचा संताप
नसरापूर : महाराष्ट्र दिनी घडलेल्या बालिकेच्या हत्येनंतर संपूर्ण परिसर हादरला असताना, आरोपी भिमराव कांबळे (वय ६५, रा. साळवडे) याच्या कुटुंबीयांनीच त्याच्यावर तीव्र संताप व्यक्त करत कठोर शिक्षेची मागणी केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आरोपीची पत्नी आणि मुलाने त्याच्याशी गेल्या १० वर्षांपासून कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.
आरोपीच्या पत्नीने अत्यंत भावनिक प्रतिक्रिया देताना, “ज्या ठिकाणी घटना घडली, त्याच ठिकाणी त्याला ठेचून मारलं पाहिजे,” असे म्हणत संताप व्यक्त केला. “मला ११ नातवंडं आहेत. त्या चिमुरडीच्या कुटुंबीयांना काय वेदना होत असतील, याची कल्पनाही करवत नाही. मी स्वतः आई आहे,” असे सांगताना त्या ढसाढसा रडल्या. गेल्या १० वर्षांपासून आरोपी घरापासून दूर असून त्याच्याशी कोणताही संपर्क नसल्याचे त्यांनी सांगितले.
“तो बाहेर काय करायचा, याची आम्हाला काहीच माहिती नव्हती. घरात मात्र त्याने मुलींशी गैरवर्तन केले नाही,” असा दावा त्यांनी केला. मात्र, त्याच्यावर पूर्वी झालेले काही आरोप माहिती असल्याचेही त्यांनी मान्य केले.
दरम्यान, आरोपीच्या मुलानेही वडिलांच्या कृत्याचा तीव्र निषेध करत कठोर शब्दांत संताप व्यक्त केला. “तो माझा बाप आहे हीच माझी चूक आहे. त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या,” अशी मागणी त्याने केली. “त्या चिमुरडीला जितक्या वेदना झाल्या, तशाच वेदना त्यालाही झाल्या पाहिजेत,” असेही तो म्हणाला.
मुलाने पुढे सांगितले की, “पूर्वीही त्याने कुटुंबातील सदस्यांवर अत्याचार केल्याच्या घटना घडल्या होत्या. तेव्हा आम्हाला घर सोडून जावे लागले. त्यानंतर आमचा त्याच्याशी काहीही संबंध राहिला नाही.” कुटुंबीयांना दोष देऊ नये, अशी विनंतीही त्याने केली. या प्रकरणानंतर पोलिसांनी आरोपीच्या घरावर नोटीस लावून पुढील तपास सुरू केला असून, परिसरात संतापाचे वातावरण कायम आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी एकमुखी मागणी नागरिकांकडून होत आहे.