ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 18:54 IST2026-05-04T18:54:11+5:302026-05-04T18:54:57+5:30
पश्चिम बंगालमध्ये १५ वर्षांनंतर ममता बॅनर्जी यांची सत्ता गेली असून भाजपने विजय मिळवला आहे. या पराभवानंतर अभिषेक बॅनर्जी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी संपूर्ण देशाला धक्का दिला आहे. गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला मतदारांनी घरचा रस्ता दाखवला असून भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. या पराभवानंतर तृणमूलचे सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी 'जनतेचा निकाल स्वीकारत असल्याचे' म्हटले आहे. मात्र, त्याच वेळी त्यांनी मतमोजणीच्या प्रक्रियेवर संशय व्यक्त करत निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.
मतमोजणीची गती संशयास्पद
निकाल स्पष्ट झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले, "लोकशाहीत जनतेचा जो काही कौल असतो, तो सर्वांनी स्वीकारलाच पाहिजे. मात्र, यावेळी मतमोजणीची प्रक्रिया कमालीची संथ आहे. २०२१ मध्ये केवळ ८-९ तासांत ९० टक्के मोजणी पूर्ण झाली होती, पण आज त्याच वेळेत केवळ ६ ते ८ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. हे असामान्य आहे."
कार्यकर्त्यांना केलं आवाहन
अभिषेक बॅनर्जी यांनी टीएमसीच्या कार्यकर्त्यांना आणि काऊंटिंग एजंट्सना धीर धरण्याचे आवाहन केले आहे. "कुठल्याही परिस्थितीत मतमोजणी केंद्र सोडू नका. अनेक ठिकाणी निकाल जाहीर करण्यास उशीर केला जात आहे. बर्धमान दक्षिणमध्ये आम्ही जिंकलेलो असतानाही पुन्हा मतमोजणी केली जात आहे, तर कल्याणीमध्ये ईव्हीएम डेटा आणि फॉर्म १७सी मध्ये तफावत आढळली आहे," असा गंभीर आरोप त्यांनी केला.
भाजपने 'दीदीं'च्या बालेकिल्ल्यात लावली खिंडार
या निवडणुकीत भाजपने मालदा, मुर्शिदाबाद आणि उत्तर बंगाल यांसारख्या तृणमूलच्या बालेकिल्ल्यांमध्ये जबरदस्त मुसंडी मारली आहे. ममता बॅनर्जी यांचा १५ वर्षांचा एकछत्री अंमल या निकालांमुळे संपुष्टात आला आहे. दुसरीकडे, ममता बॅनर्जी सध्या काऊंटिंग सेंटरमध्येच ठाण मांडून आहेत. "भाजप आमची मतमोजणी केंद्रे लुटत आहे," असा आरोप त्यांनी केला असून, त्या लवकरच राज्यपालांची भेट घेऊन आपला राजीनामा सोपवण्याची शक्यता आहे.