Pune Crime: आरोपी २ वेळा बेलवर बाहेर आला अन् पुन्हा...; नसरापूर प्रकरणावर रोहित पवारांचा संताप (video)
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 15:09 IST2026-05-02T15:07:39+5:302026-05-02T15:09:29+5:30
...आता तरी शक्ती कायदा लागू करा; नसरापूरात चिमुकलीवरील अत्याचार-हत्येनंतर रोहित पवारांचा संताप

Pune Crime: आरोपी २ वेळा बेलवर बाहेर आला अन् पुन्हा...; नसरापूर प्रकरणावर रोहित पवारांचा संताप (video)
नसरापूर (पुणे जि.) : भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षीय निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधत सरकार आणि कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
रोहित पवार म्हणाले की, ही घटना इतकी दुर्दैवी आहे की तिचा विचारही करता येत नाही. गावातील प्रत्येक व्यक्ती त्या मुलीला ओळखत होती. त्यामुळे लोकांचा आक्रोश स्वाभाविक आणि योग्य आहे. त्यांनी सांगितले की, या प्रकरणातील आरोपी यापूर्वीही दोन वेळा जामिनावर बाहेर आला होता. अशा गंभीर गुन्ह्यांतील आरोपी पुन्हा पुन्हा बेलवर बाहेर येत असतील, तर समाजाने काय अपेक्षा ठेवायची? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. रोहित पवार यांनी या प्रकरणात फास्ट ट्रॅक न्यायालयाची मागणी केली असून मुख्यमंत्रीांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगितले. तसेच पीडित मुलीच्या कुटुंबाला शासकीय मदत, घर आणि आईला सरकारी नोकरी देण्याची मागणीही त्यांनी केली. ते पुढे म्हणाले,1983 मधील एका प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा झाली होती. या प्रकरणातही कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी, असेही ते म्हणाले.
‘महाराष्ट्रात दिवसाला 24 बलात्कार’
राज्यातील वाढत्या गुन्हेगारीकडे लक्ष वेधताना रोहित पवार म्हणाले की, “एप्रिल 2026 मध्ये बीडमध्येही अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली. महाराष्ट्रात दिवसाला 24 बलात्कार होत आहेत. राज्यातील कायदा-सुव्यवस्था कोलमडल्याचे चित्र आहे.” त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रस्तावित करण्यात आलेल्या शक्ती कायदा चा मुद्दाही उपस्थित केला. “महाविकास आघाडीने शक्ती कायदा आणला होता, मात्र केंद्र सरकारने तो मंजूर केला नाही. आता तरी सरकारने विशेष अधिवेशन घेऊन कठोर कायदा लागू करावा,” अशी मागणी त्यांनी केली.