कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत आईचा मृत्यू..! वाढदिवसाच्या दिवशीच २ चिमुकले झाले पोरके
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 12:21 IST2026-04-30T12:21:07+5:302026-04-30T12:21:50+5:30
- आईचा स्पर्श, अंगाई गीत, आणि रडताना जवळ घेणारी माया हे सर्व आता त्या चिमुकल्यांसाठी कायमचे हरवले आहे.

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत आईचा मृत्यू..! वाढदिवसाच्या दिवशीच २ चिमुकले झाले पोरके
केडगाव (पुणे जि.) : दौंड तालुक्यातील खोर येथे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेदरम्यान २२ वर्षीय रंजना बाबू केसकर यांचा मृत्यू झाल्याने दोन लहान मुले आईच्या मायेपासून कायमची वंचित झाली आहेत.
पीयूष (वय २) अजून आईच्या कुशीत खेळण्याच्या वयात, तर आरोही अवधी एक वर्षाची..विशेष म्हणजे २८ तारखेला आरोहीचा पहिलाच वाढदिवस साजरा करण्याची तयारी घरात सुरू होती. मात्र नियतीने क्रूर वळण घेत, त्याच दिवशी आईचे निधन झाले आणि आनंदाचा क्षण दुःखात बदलला.
आईचा स्पर्श, अंगाई गीत, आणि रडताना जवळ घेणारी माया हे सर्व आता त्या चिमुकल्यांसाठी कायमचे हरवले आहे. आईसाठी व्याकुळ होणाऱ्या मुलांचे रडणे पाहून नातेवाईक आणि गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत.या घटनेमुळे आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
केडगाव आरोग्य उपकेंद्र, शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर, भूलतज्ज्ञ, संबंधित खासगी रुग्णालय किंवा पुढील उपचारासाठी नेण्यात आलेले ससून रुग्णालय नेमकी जबाबदारी कुणाची, याबाबत संभ्रम कायम आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
नातेवाइकांचा आक्रोश, गावकऱ्यांचा संताप आणि दोन निष्पाप मुलांचे अश्रू या सगळ्यांनी वातावरण शोकाकुल झाले आहे. 'आई परत येणार नाही; पण अशा घटना पुन्हा घडू नयेत,' अशी भावना व्यक्त होत आहे.