उत्पन्न वाढीच्या नादात ‘पीएमपी’ने गमावले प्रवासी; तिकीट दरवाढ करूनही ‘पीएमपी’च्या उत्पन्नात तूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 12:53 IST2026-04-23T12:52:45+5:302026-04-23T12:53:20+5:30
- दरवाढ करूनही अपेक्षित उत्पन्न मिळत नाही, याचाच अर्थ प्रवासी संख्या कमी होत आहे.

उत्पन्न वाढीच्या नादात ‘पीएमपी’ने गमावले प्रवासी; तिकीट दरवाढ करूनही ‘पीएमपी’च्या उत्पन्नात तूट
- अंबादास गवंडी
पुणे :पुणे आणि पिंपरी - चिंचवड शहराची जीवनवाहिनी असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) उत्पन्न वाढीसाठी केलेली तिकीट दरवाढ आता महामंडळाच्याच मुळावर आली असल्याचे चित्र आहे.
तिकीट दरवाढ झाल्याने प्रवाशांनी पीएमपीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. १ जून २०२५पासून लागू करण्यात आलेल्या दरवाढीतून वर्षांला ३०० कोटी रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळेल, असा अंदाज ‘पीएमपी’ प्रशासनाने बांधला होता. मात्र, प्रत्यक्षात केवळ १४७ कोटी रुपये उत्पन्नात वाढ झाली आहे. शिवाय गेल्या काही महिन्यांपासून महसुलाचा हा आलेख सातत्याने घसरत आहे. दरवाढ करूनही अपेक्षित उत्पन्न मिळत नाही, याचाच अर्थ प्रवासी संख्या कमी होत आहे.
दरवाढ लागू होण्यापूर्वी ‘पीएमपी’ला महिन्याला साधारण ४८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत होते. जून २०२५मध्ये दरवाढ लागू होताच हे उत्पन्न ६२ कोटींवर गेले. जुलै २०२५मध्ये ६८ कोटींच्या उच्चांकावर पोहोचले. मात्र, हा उत्पन्नाचा आलेख फार काळ टिकला नाही.
ऑगस्ट २०२५ पासून महसुलात पुन्हा घसरण सुरू झाली. मार्च २०२६पर्यंत मासिक उत्पन्न ५९ कोटींपर्यंत खाली आले आहे. दरवाढ करूनही अपेक्षित लक्ष्य गाठण्यात महामंडळ अपयशी ठरले आहे. परिणामी दरवाढीचा सर्वाधिक फटका प्रवासी संख्येला बसला आहे. दरवाढ लागू झाल्यावर सुरुवातीला महिना २५ ते ३० हजार प्रवाशांची घट नोंदवली गेली होती. मात्र, आता हा आकडा महिन्याला ७० ते ८० हजार प्रवाशांपर्यंत पोहोचला आहे. ‘पीएमपी’ने लादलेली दरवाढ आणि त्याबदल्यात मिळणारी निकृष्ट सेवा यामुळे नागरिक आता खासगी वाहने किंवा मेट्रोकडे वळू लागले आहेत.
मेट्रो ठरतेय ‘स्वस्त’ पर्याय
पुणे मेट्रोचे जाळे विस्तारत असताना ‘पीएमपी’ने केलेली दरवाढ प्रवाशांच्या खिशाला परवडणारी ठरत नाही. काही प्रमुख मार्गांवर ‘पीएमपी’च्या तिकिटापेक्षा मेट्रोचे तिकीट स्वस्त असल्याने नोकरदार आणि विद्यार्थीवर्गाने मेट्रोला पसंती दिली आहे. तसेच ऑनलाइन तिकीट आणि बस ट्रॅकिंग सुविधा सुरू करूनही बसचे वेळापत्रक न पाळल्यामुळे प्रवाशांचा ‘पीएमपी’वरील विश्वास उडत चालला आहे.
आकडेवारी काय सांगते?
- दरवाढीपूर्वीचे मासिक उत्पन्न : ४८ कोटी
- जून २०२५ (दरवाढ लागू) : ६२ कोटी
- जुलै २०२५ (सर्वाधिक) : ६८ कोटी
- मार्च २०२६ : ५९ कोटी
- अपेक्षित अतिरिक्त वार्षिक उत्पन्न : ३०० कोटी
- २०२५-२६ मध्ये तिकिटातून मिळालेले वार्षिक उत्पन्न : ७१९ कोटी
- २०२४-२५ मधील तिकिटातून मिळालेले वार्षिक उत्पन्न : ५७२ कोटी
प्रवाशांची पाठ फिरवण्याची मुख्य कारणे
- ब्रेकडाउनचा विळखा : बस वेळेवर न येणे आणि मध्येच नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे.
- अस्वच्छता व वर्तणूक : बसमधील अस्वच्छता, काही वाहक-चालकांच्या अरेरावीच्या तक्रारी कायम आहेत.
- मेट्रोची स्पर्धा : मेट्रोचा प्रवास वेगवान आणि ‘पीएमपी’च्या तुलनेत काही मार्गांवर स्वस्त आहे.
- चुकीची स्टेज रचना : बस स्टॉपच्या अंतराची (स्टेज) रचना सदोष असल्याच्या तक्रारी वारंवार करूनही प्रशासनाने त्यात बदल केला नाही.
प्रशासकीय अपयश की नियोजनाचा अभाव ?
‘पीएमपी’च्या तत्कालीन अध्यक्षांनी सर्व अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष फिल्डवर उतरवल्यानंतर उत्पन्न ५५ कोटींपर्यंत गेले होते. तेव्हा कोणतीही तिकीट दरवाढ केली नव्हती. मग आता दरवाढ करूनही उत्पन्न ५९ कोटींवर का अडकले आहे? खर्च वाढत असताना संचालन तूट कमी करण्यात प्रशासनाला का यश येत नाही? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
पीएमपी प्रशासनाने तिकीट दरवाढ करताना सेवेचा दर्जा सुधारेल, असे आश्वासन दिले होते. मात्र, बसचे ब्रेकडाउन आणि अस्वच्छता आजही कायम आहे. काही वेळा मेट्रो परवडते, मग आम्ही पीएमपीने का फिरायचे. - सागर सावंत, प्रवासी