"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 18:01 IST2026-04-23T17:58:50+5:302026-04-23T18:01:40+5:30
Maharashtra MLC Election: कमी संख्याबळ असल्यामुळे राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची अडचण झाली आहे. राज्यसभेची जागा शरद पवारांना दिल्यानंतर, आता विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरेंना देण्याचा मुद्दा समोर आला आहे.

"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
MVA internal rift over MLC seat sharing: राज्यसभा निवडणुकीत उद्धवसेनेने थेट शरद पवारांनी निवडणूक लढवावी असे जाहीर करून टाकले. त्यामुळे काँग्रेसला पाठिंबा द्यावा लागला. पण, आता विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) उद्धव ठाकरेंना पाठिंबा जाहीर केला. दुसऱ्यांदा कोंडीत सापडलेल्या काँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे. आणखी त्याग करावा लागून नये, यासाठी पक्षाचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा देऊ, पण पुढील राज्यसभा निवडणुकीच्या जागेबद्दल आताच निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली आहे.
राज्यात विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा निवडणूक लढवावी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होत होती. काँग्रेसकडून या निवडणुकीबद्दल मौन बाळगले गेले होते. पण, आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने उद्धव ठाकरेंनीच निवडणूक लढवावी, अशी भूमिका जाहीर करून टाकली. या मागणीमुळे काँग्रेसला त्याग करावा लागणार असेच दिसत आहे.
काँग्रेस नेते म्हणाले, "...तर उमेदवार कोण, याबद्दल चर्चा करावी लागेल"
काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, "महाराष्ट्रात विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. या जागेवर माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे लढणार असतील तर त्याचे स्वागत असेल. पण ते जर निवडणूक लढणार नसतील तर मग महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याबाबत चर्चा करावी लागेल."
राज्यसभेच्या जागेवर काँग्रेसचा दावा?
वडेट्टीवार यांनी विधान परिषद निवडणुकीबरोबरच आगामी राज्यसभा निवडणुकीबद्दलही आताच निर्णय घेण्यात यावा, अशी भूमिका घेतली आहे. वडेट्टीवार पुढे म्हणाले की, "कारण त्यानंतर येणाऱ्या राज्यसभेच्या जागी कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल, याबाबत ही आताच स्पष्टता करावी लागेल! महाविकास आघाडी एकसंध राहण्यासाठी तिन्ही पक्षाच्या समन्वयाने निर्णय घ्यावे लागतील. मीडियाच्या माध्यमातून याबाबत चर्चा घडवून आणणे उचित नाही", असे सांगत वडेट्टीवार यांनी राज्यसभेच्या जागेवर अप्रत्यक्षपणे काँग्रेसचा दावा केला आहे.
महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. या जागेवर माजी मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे लढणार असतील तर त्याचे स्वागत असेल. पण ते जर निवडणूक लढणार नसतील तर मग महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याबाबत चर्चा करावी लागेल. कारण त्यानंतर येणाऱ्या राज्यसभेच्या जागी कोणत्या पक्षाचा…
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) April 23, 2026
पवार-ठाकरेंचे गणित, काँग्रेसमध्ये नाराजी?
काही दिवसांपूर्वी राज्यसभेची निवडणूक झाली. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत एकच उमेदवार निवडता येईल, इतकेच संख्याबळ महाविकास आघाडीकडे आहे.
'उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषद निवडणूक लढावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची आग्रहाची विनंती आहे', अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. अशाच पद्धतीची मागणी उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी-उद्धवसेनेचे गणित जुळून आले असले, तरी काँग्रेसच्या पदरी दुसऱ्यांदा निराशा पडणार आहे.
काँग्रेसचा दुसऱ्यांदा त्याग
ही विधान परिषद निवडणूक उद्धव ठाकरेंनी लढवली, तर काँग्रेसला दुसऱ्यांदा त्याग करावा लागणार आहे. राज्यसभा निवडणुकीवेळीही काँग्रेसमधून नाराजी व्यक्त केली गेली होती. आता परत उद्धवसेनेला जागा दिल्यानंतर त्याचे पडसाद काँग्रेसमध्ये उमटू शकतात. पण, आता काँग्रेसने यापुढे त्याग केला जाणार नाही, अशीच भूमिका घेतल्याचे दिसत आहे.