बनावट दस्तऐवज तयार करून पतसंस्थेत साडेसहा कोटींचा अपहार; ३६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 19:58 IST2026-04-16T19:57:22+5:302026-04-16T19:58:38+5:30
संशयितांनी संगनमताने कट रचून स्वतःच्या फायद्यासाठी पतसंस्थेचे सोनेतारण, मालमत्ता तारण आणि वैयक्तिक कर्जाच्या व्यवहारात अफरातफर केली.

बनावट दस्तऐवज तयार करून पतसंस्थेत साडेसहा कोटींचा अपहार; ३६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा
पिंपरी : बनावट दस्तऐवज तयार करून ६ कोटी ५३ लाख ९२ हजार ४२ रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खेड तालुक्यातील वाकी बुद्रूक येथे भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत २०१३-१४ ते २०१७-१८ या आर्थिक वर्षांमध्ये ही घटना घडली. सुनील मथुरा काळे (वय ५५, रा. मोहननगर, धनकवडी, पुणे) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. १५ एप्रिल) उत्तर चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रामदास हिरामण कड, तुकाराम पिराजी टोपे, किसन सोपान गारगोटे, बाळासाहेब पंडित गारगोटे, रवींद्र नामदेव गारगोटे, अनिल गोविंद टोपे, शिवाजी बाबूराव जरे, काळुराम पांडुरंग टोपे, राजाराम किसन टोपे, सुरेश रंगनाथ लोखंडे, दत्तात्रय वाल्मीक गोरे, शांताराम बापू जगताप, विमल बबन गारगोटे, रामदास ज्ञानेश्वर जाधव, गोरख भागुजी टोपे, सुरेखा लक्ष्मणराव टोपे, मारुती ज्ञानोबा गारगोटे, राहुल रामदास टोपे, दत्तात्रय संतू टोपे, अंकुश रामदास जरे, नीलेश हनुमंत टोपे, सुरेश शिवाजी टोपे, संतोष दत्तात्रय टिपरे, सुरेखा लहू गारगोटे, सुरेखा संजय टोपे, काळुराम लक्ष्मण गारगोटे, शिवाजी दगडू टोपे, सुरज लक्ष्मण टोपे, सुरेखा लक्ष्मण टोपे, शिवाजी किसन भोंडवे, सारिका रोहिदास गारगोटे, रोहिदास तुकाराम गारगोटे, सुरेखा सुरेश लोखंडे, अनिता काळुराम गारगोटे, विशाल दत्तात्रय पवळे, रामदास संतू टोपे (सर्व रा. वाकी बुद्रूक, ता. खेड, जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी संगनमताने कट रचून स्वतःच्या फायद्यासाठी पतसंस्थेचे सोनेतारण, मालमत्ता तारण आणि वैयक्तिक कर्जाच्या व्यवहारात अफरातफर केली. दैनंदिन जमा रकमा रोजकिर्दीस जमा न करणे, बँकेत पैसे भरल्याच्या खोट्या नोंदी करणे, बचत खात्यातून बोगस स्वाक्षरीने पैसे काढणे आणि पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत खोटी गुंतवणूक दर्शवणे, दैनंदिन ठेव कमी शिल्लक असताना जादा रक्कम नावे टाकून हात शिल्लक घटविणे, अशा प्रकारे ठेवीदारांचा विश्वासघात केला. या कपटपूर्ण कसुरी करून बनावट दस्तऐवज बनवला. या व्यवहारामुळे पतसंस्थेसह खातेदार आणि सभासदांची मोठी फसवणूक झाली आहे.