संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 12:34 IST2026-04-17T12:08:14+5:302026-04-17T12:34:37+5:30
"पंतप्रधान मोदी हे लोकशाही व्यवस्थेतून निवडून आले आहेत. त्यांच्या कडून कुणी इंदिरा गांधींप्रमाणे खुर्ची हिरावून घेत नाहीये, त्यामुळे ते लोकशाही का संपवतील?" असा सवाल करत कंगना रणौत यांनी प्रियंका गांधंवर पलटवार केला.

संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
सध्या संसदेच्या विशेष अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात महिला आरक्षण आणि मतदारसंघांच्या पुनर्रचना (परिसीमन) विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जबरदस्त शाब्दिक रणकंदण सुरू आहे. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी भाजपवर लोकशाही संपवण्याचा आरोप केला. यानंतर, भाजप खासदार कंगना रणौत यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला. "पंतप्रधान मोदी हे लोकशाही व्यवस्थेतून निवडून आले आहेत. त्यांच्या कडून कुणी इंदिरा गांधींप्रमाणे खुर्ची हिरावून घेत नाहीये, त्यामुळे ते लोकशाही का संपवतील?" असा सवाल करत कंगना रणौत यांनी प्रियंका गांधंवर पलटवार केला.
काय म्हणाल्या कंगना?
प्रियांका गांधी यांच्या 'लोकशाही धोक्यात' असल्याच्या विधानावर पलटवार करताना कंगना म्हणाल्या, "जेव्हा काही चांगले घडते, तेव्हा काँग्रेसच्या पोटात गोळा येतो. आताही त्यांची तीच स्थिती झाली आहे. प्रियांका गांधी म्हणत आहेत की, ते संविधान बदलतील... लोकशाही संपवतील... आम्ही काहीही करत असलो की, म्हणतात लोकशाही संपवतील. तुम्ही थोडा जरी विचार केला तर लक्षात येईल, पंतप्रधान एक लोकप्रिय नेते आहेत, लोकशाही मार्गाने निवडून आलेले नेते आहेत. लोकशाहीनेच त्यांच्या पक्षाला सत्तेवर आणले आहे. ते ती लोकशाही का संपवतील?" एवढेच नाही तर, "कुणी इंदिरागांधी प्रमाणे त्यांच्याकडून खुर्ची थोडीच घेतंय, की त्यांना खुर्ची राखून ठेवायची आहे, ज्यासाठी त्यांना लोकशाही संपवावीच लागेल. अशी तर काही परिस्थिती नाही," असा टोलाही कंगना यांनी प्रियंकांना लगावला.
"जाओ बेटियों, जी लो अपनी जिंदगी" -
यावेळी कंगना रणौत यांनी महिला आरक्षणाचे स्वागत करताना एका प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपटातील डायलॉग सांगितला. त्या म्हणाल्या, "ज्या प्रमाणे चित्रपटात म्हटले होते, 'जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी', तसेच आज आपल्या सरकारने भारतातील लेकींना सर्व पिंजरे आणि भिंती तोडून 'जाओ बेटियों, जी लो अपनी जिंदगी' असे म्हटले आहे.
"मतदारसंघ पुनर्रचनेसंदर्भातही स्पष्टच बोलल्या कंगना -
मतदारसंघांच्या पुनर्रचनेवरून होणाऱ्या आरोपांना उत्तर देताना कंगना म्हणाल्या, "ही कोणतीही नवीन प्रक्रिया नसून एक घटनात्मक प्रक्रिया आहे. ५१, ६१ आणि ७१ मध्येही हे घडले आहे. "प्रियंका गांधी म्हणतात की सरकारला एवढी घाई का आहे? तर मग तुमच्यासारखे ३० वर्षे हे बिल लटकवून ठेवायचे का?" असा प्रश्न कंगना यांनी यावेळी केला. एवढेच नाही तर, ६० वर्षांत जे झाले नाही, ते पंतप्रधानांनी १० वर्षांत करून दाखवले आहे, असेही त्या म्हणाल्या.