Survey: बंगालमध्ये भाजप जोमात! मतांचा पाऊस पडणार; पण अमित शहांसाठी वाईट बातमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 12:54 PM2021-02-16T12:54:56+5:302021-02-16T13:00:23+5:30

West Bengal Assembly Election 2021 Survey: भाजपला मिळणाऱ्या मतदानात वाढ होणार; १०० हून अधिक जागा जिंकण्याचा अंदाज

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलं आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात यंदा थेट लढत होत आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून भाजपनं बंगालच्या राजकारणात चंचूप्रवेश केला. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं जोरदार मुसंडी मारली.

गेल्या काही महिन्यांपासून भाजपनं तृणमूल काँग्रेसला पद्धतशीरपणे खिंडार पाडलं आहे. तृणमूलच्या अनेक नेत्यांनी भाजपची वाट धरली आहे. त्यामुळे तृणमूलच्या अडचणी वाढल्या आहेत.

भाजपचे नेते आणि गृहमंत्री अमित शहांनी बंगालमधील निवडणुकीत जातीनं लक्ष घातलं आहे. एकीकडे बंगालमध्ये राजकारण तापलं असताना या निवडणुकीत नेमकं काय घडू शकतं याबद्दल सीएनएक्सनं एक सर्व्हेक्षण केलं आहे.

सीएनएक्सनं केलेल्या सर्व्हेक्षणानुसार गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपला मिळणाऱ्या मतांच्या टक्केवारीत खूप मोठी वाढ होईल. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत बंगालमध्ये भाजपला ४० टक्के मतं मिळाली. त्यामुळे तृणमूलला निवडणूक जड गेली.

सीएनएक्सच्या सर्व्हेनुसार, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत २६ टक्के अधिक मतदान होईल. पण तरीही भाजपला तृणमूलला भाजपपेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत.

सीएनएक्सनं केलेल्या सर्व्हेक्षणातील आकडेवारीनुसार, भाजपला ११७ जागा मिळू शकतात. तर तृणमूलला १५१ जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि डाव्यांच्या आघाडीला २४ जागांवर समाधान मानावं लागू शकतं. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण २९४ जागा आहेत.

तृणमूलनं काँग्रेस-डाव्यांसोबत आघाडी केल्यास त्यांना फायदा होईल. अशी आघाडी झाल्यास त्यांच्या जागा वाढतील. मतांचं विभाजन टळल्यानं त्याचा थेट फटका भाजपला बसेल.

गेल्या काही महिन्यांपासून तृणमूलमधील अनेक नेते काँग्रेस-डाव्यांसोबत आघाडी करण्याची मागणी करत आहेत. मात्र अद्याप तरी तृणमूलच्या अध्यक्षा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी याबद्दल निर्णय घेतलेला नाही.

गेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलनं तब्बल २११ जागा जिंकल्या होत्या. तर भाजपला अवघ्या ३ जागांवर यश मिळालं होतं. पण २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं ४२ पैकी १८ जागा जिंकत मुसंडी मारली. तर तृणमूलच्या खासदारांची संख्या ३४ वरून २२ वर आली.