Delhi Violence: Photo's : 'गोली मारो' घोषणांच्या आंदोलनाच्या नेतृत्वात भाजपा आमदार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 12:36 PM2020-02-26T12:36:52+5:302020-02-26T13:00:23+5:30

BJP MLA Abhay Verma leads East Delhi march with ‘Goli maaro saalo ko’ as mob violence continues

गेल्या दोन महिन्यांपासून शांततेने सुरू असलेल्या सीएएविरोधातील आंदोलनास देशाची राजधानी दिल्ली येथे सोमवारी हिंसाचाराने तडा गेल्यानंतर मंगळवारी आगडोंब उसळला.

या हिंसाचाराने एका पोलिसासह 20 जणांचा बळी घेतला आहे. शिवाय 67 पोलिसांसह 150 हून अधिक दिल्लीकर जखमी झाले आहेत.

जाफराबाद, मौजपूर, चांद बाग, कारावाल नगर येथे संचारबंदी लागू करण्यात आली असून दंगेखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना देण्यात आले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात असतानाच हिंसाचार उसळल्याने गृह विभागाने यामागे कट असल्याचाही संशय व्यक्त केला.

दिल्लीतील स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने आयपीएस अधिकारी एस. एन. श्रीवास्तव यांना सीआरपीएफमधून माघारी बोलावून दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त (कायदा-सुव्यवस्था) म्हणून तत्काळ नियुक्त केले.

भजनपुरा आणि खजुरी खसमध्ये जाळपोळ आणि दगडफेक झाल्याने पोलिसांनी या भागात संचलन केले. दिल्ली पोलिसांनी रात्रीपर्यंत ११ एफआयआर दाखल करत वीसहून अधिक लोकांना अटक केली आहे.

ईशान्य दिल्लीत रविवारी रात्रीपासून कायद्याचे समर्थक व विरोधकांमध्ये संघर्ष पेटला. सोमवारी हिंसाचाराने हेड कॉन्स्टेबल रतनलाल यांचा बळी घेतला.

मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीची बैठक बोलावली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, नायब राज्यपाल अनिल बैजल बैठकीत उपस्थित होते.

सीएए, एनआरसीला होणाऱ्या विरोधानंतर दिल्लीत उसळलेल्या भयानक जातीय दंगलीमुळे आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांची संख्या कमी असल्यामुळेच हिंसाचार भडकल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी गृहमंत्रालयाला दिली. त्यामुळेच हिंसाचार रोखण्यात अपयश आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर एक हजार सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले असून, आंतरराज्य सीमारेषेवर लक्ष ठेवले जात असल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दिल्लीतील हिंसाचारी घटनांमध्ये प्रक्षोभक घोषणा देणाऱ्या एका आंदोलनाचे नेतृत्व करतानाचा, भाजपा आमदाराचा व्हिडीओ समोर आला आहे.

लक्ष्मीनगर मतदारसंघातील भाजपा आमदार अभय वर्मा हे मंगल बझार येथील एका मोर्चाचे नेृतत्व करत आहे. विशेष म्हणजे या आंदोलनातील मोर्चामध्ये गोली मारो, जो हिंदु हित की बात करेगा, वो देश पे राज करेगा, जय श्रीराम या घोषणा देण्यात येत आहेत.

आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंग यांनी व्हिडिओ ट्विट करुन याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.तसेच, अमित शहांनी संबंधित आमदारांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केलीय.