मुलीच्या लग्नासाठी जमवलेले पैसे पुराच्या पाण्यात भिजले; कुटुंबाने रस्त्यावर सुकवण्यासाठी ठेवले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 11:07 AM2020-09-02T11:07:32+5:302020-09-02T11:10:51+5:30

मध्यप्रदेशातील संजय सरोवरचे पाणी सोडण्यात आल्याने वैनगंगेला पूर आला असून गत ४८ तासांपासून अनेक गावे अजूनही पाण्याखाली आहेत. यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. दिवसभर भंडारा - लाखनी, भंडारा - नागपूर मार्ग बंद होता. पूर ओसरत असला तरी आजही हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आहे.

संततधार पावसाने व धरणाच्या अनियमित पाण्याच्या विसर्गाने वैनगंगा नदीचे पात्र फुगून भंडारा शहरातील बीटीबी सब्जी मंडी पुराच्या पाण्यात बुडली. सुमारे ३० फूट पाणी बीटीबी मंडीच्या आवारात असून रस्त्यावर चाळीस फुट पाण्याचा प्रवाह वाहत आहे. या संकटकालीन पुरात बीटीबी सब्जी मंडीचे मोठे नुकसान झाले आहे.

भंडारा जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे अनेक लोकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पुरामुळे एका मजुराच्या कुटुंबावर संकट कोसळलं आहे. मुलीच्या लग्नासाठी जमा केलेली रक्कम पुराच्या पाण्यात भिजली आहे.

पुढील महिन्यात मजुराच्या मुलीचं लग्न आहे. मात्र पावसामुळे आलेल्या पुरात पैसे भिजल्याने आता काय करायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. जितके पैसे मिळाले आहेत ते वाळवण्यासाठी रस्त्यावर पैसे वाळत घातलेल.

पैशांव्यतिरिक्त मुलीच्या लग्नासाठी काही सामान खरेदी केले होते ते पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. त्यामुळे चहुबाजूने मजुराच्या कुटुंबावर संकट कोसळलं आहे. पुढील महिन्यात मुलीचं लग्न आहे. विदर्भात वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे.

काही भागात पूराच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. परंतु नुकसानीची अनेक भीतीदायक छायाचित्रे पुढे येत आहेत. कोणाचे सामना खराब झाले आहे तर कुणाचं घर पडलं आहे. झोपडपट्टी परिसरातील राहणाऱ्या लोकांचे मोठे नुकसान झाले आहे.

१९९४ नंतर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पूराने हाहाकार माजवला आहे. जिल्ह्यातील ६२ गावांवर याचा परिणाम झाला आहे. सुमारे १८ हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे. या लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. जिल्ह्यातील बरीच घरे, शेतकऱ्यांच्या धान पिकासह अनेक वस्तूंना या पुराचा फटका बसला आहे.

पूरग्रस्त भागात बचावासाठी एनडीआरएफच्या पथकांना पुण्याहून नागपूर येथे विमानाने हलविण्यात आले आहे. हे पथक नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यातील बाधित भागात बचाव कार्यात सहकार्य करीत आहेत. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी परिसरातील ५ गावात वैनगंगा नदीचे पाणी भरले आहे.

मागच्या गुरुवार, शुक्रवारी मुसळधार पावसाने जिल्हाभर हजेरी लावली. मात्र भंडारा जिल्ह्याच्या वर असलेले बावनथडी धरण, संजय सरोवर तसेच मध्य प्रदेशातील आणखी काही धरणाचे पाणी वैनगंगेलाला विसर्ग करण्यात आल्याने पुराचा धोका भंडारावासियांना सहन करावा लागला.

नैसर्गिक आपदा असल्याने शासनाने याची दखल घेतली पाहिजे. धान खरेदी केंद्र संचालकांचा यात दोष नाही. यात प्रचंड नुकसान झाले असल्याने त्यांना सवलत देण्यात यावी. या गावात नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेकांचे खाद्यान्न यात बुडाले आहेत. त्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात आली नाही. यामुळे बेघर कुटुंब अडचणीत आले आहेत. महसूल विभागाने या नुकसानग्रस्तांचा तात्काळ सर्वेक्षण करून आर्थिक मदत देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

Read in English