अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 06:22 IST2026-05-02T06:18:37+5:302026-05-02T06:22:25+5:30
बीकेसी-कलानगर भागात उभारलेल्या सायकल ट्रॅकचा खर्च गेला पाण्यात, कोट्यवधी रुपये खर्चून ही सुविधा उभारली जात असताना तिचा वापर होणार आहे की नाही, वाढणारी वाहतूक, रस्ता रुंदीकरण आदींचा अभ्यासही आधीच करणे अपेक्षित होते.

अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
अमर शैला
मुंबई - मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनविण्याचे स्वप्न पाहून सायकल ट्रॅक उभारण्यात आले, मात्र काही वर्षांतच ते काढून तरी टाकावे लागले आहेत, किंवा वापराविना शोभेचे ठिकाण बनले आहेत. ट्रॅकच्या उभारणीचा कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.
बीकेसी येथे देशी-परदेशी कंपन्यांची भारतातील मुख्यालये आहेत. येथे ६० कोटी रुपये खर्चून बांधलेले ट्रॅक काढून टाकण्याची नामुष्की एमएमआरडीएवर ओढवली. हे ट्रॅक काढण्यासाठीच एमएमआरडीएने २५ कोटी रुपयांचा खर्च केला. रस्ते रुंदीकरणासाठी ते काढण्यात आल्याचे आता एमएमआरडीए सांगत असली तरी कोट्यवधी रुपये खर्चून ही सुविधा उभारली जात असताना तिचा वापर होणार आहे की नाही, वाढणारी वाहतूक, रस्ता रुंदीकरण आदींचा अभ्यासही आधीच करणे अपेक्षित होते.
कमी अंतराच्या सायकल ट्रॅककडे पाठ: नियमित सायकल चालविणाऱ्यांना घरापासून बाहेर पडल्यावर इच्छित स्थळी पोहोचण्याच्या ठिकाणापर्यंत ट्रॅक हवा असतो. मात्र मुंबईत सलग आणि लांब अंतराचे ट्रॅक नाहीत. त्यामुळे कमी अंतरावर चालविण्यासाठी सायकल कोण खरेदी करेल, असा प्रश्न विचारला जात आहे.
कशासाठी काढले सायकल ट्रॅक?
बीकेसीमध्ये काही वर्षात मेट्रो, पॉड टॅक्सी यांचे जाळे उभे राहणार आहे. येथे येणाऱ्या प्रवाशांना प्रवासाची ही नवी साधने उपलब्ध होतील. वाहतूक कोंडीही होईल. त्यामुळे सायकल ट्रॅकची गरज उरलेली नाही, असे एमएमआरडीएला वाटते. मात्र, आताच ट्रॅक काढणे आवश्यक होते का? असा प्रश्न तज्ज्ञांनी केला आहे.
पश्चिम द्रुतगती मार्गावर वांद्रे ते वाकोला दरम्यान आंतरराष्ट्रीय मानदंडानुसार पदपथावर सुविधा निर्माण केली जाणार होती. त्यानुसार कलानगर ते खेरवाडी दरम्यान सायकल ट्रॅक आणि पदपथाची निर्मिती करण्यात आली. थर्मोप्लास्टिक फिनिश असलेला ट्रॅक उभारण्यात आला. मात्र, तो फारच थोड्या अंतराचा आहे. वापराविना आता तो केवळ शोभेचे ठिकाण बनला आहे. हा प्रकल्प मविआ सरकारच्या कार्यकाळातील होता. सरकार बदलल्यानंतर तो थंडबस्त्यात गेला आहे. त्यामुळे भविष्यातही या ट्रॅकला पुढे जोडणी मिळण्याची शक्यता नाही.