मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 06:07 IST2026-05-02T06:07:09+5:302026-05-02T06:07:51+5:30
मुंबई-पुणे प्रवासातील अंतर ६ कि.मी.ने कमी होणार असून, प्रवाशांच्या वेळेत सुमारे ३० मिनिटांची बचत होईल.

मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
मुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी उभारण्यात आलेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात तांत्रिकदृष्ट्या जगभरातील उच्च तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या प्रकल्पातील पुलांचे बांधकाम आणि बोगद्यांमधील सुरक्षा यंत्रणांमध्ये जगातील सात महत्त्वाच्या देशांतील नामांकित कंपन्या आणि संस्थांची मदत घेतली आहे. आंतरराष्ट्रीय संस्था काम पाहत होती.
पुलाची वाऱ्याच्या वेगाशी संबंधित चाचणी डेन्मार्कमधील कोपेनहेगन येथील ‘फोर्स टेक्नॉलॉजी’मध्ये केली. पुलाच्या केबल्सची चाचणी ऑस्ट्रियातील व्हिएन्ना विद्यापीठात करण्यात आली, तर रस्त्यावरील सुरक्षा कठड्यांचे तंत्रज्ञान ‘डेल्टा ब्लॉक’ या ऑस्ट्रियन संस्थेकडून घेतले आहे. पुलाचे तांत्रिक संरेखन ‘मे. विकॉन लि.’ या तैवानच्या कंपनीने केले आहे. बोगद्यातील अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणेची चाचणी स्पेनमधील ‘अपुल्स लॅब’मध्ये यशस्वीरीत्या पूर्ण झाली. प्रकल्पासाठी लागणाऱ्या विशेष केबल्सचे उत्पादन ‘मे. किसवायर’ या मलेशियन कंपनीने केले आहे.
प्रकल्पाचे प्रमुख फायदे
मुंबई-पुणे प्रवासातील अंतर ६ कि.मी.ने कमी होणार असून, प्रवाशांच्या वेळेत सुमारे ३० मिनिटांची बचत होईल. वेगवान प्रवासामुळे वाहनांच्या इंधनाचा वापर कमी होईल, यातून दररोज अंदाजे १ कोटी रुपयांची बचत होईल. घाटातील तीव्र वळणे आणि दरडी कोसळण्याचा धोका टाळता येणार असल्याने हा मार्ग ‘शून्य अपघात’ मार्ग म्हणून ओळखला जाईल. बोरघाटातील जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि द्रुतगती मार्ग एकत्र येत असल्याने होणारी वाहतूककोंडी संपुष्टात येईल. इंधन बचतीमुळे प्रदूषणात लक्षणीय घट होण्यास मदत होईल.