‘कर्मयोगी’ बनणार पोस्टाचे ४ लाख कर्मचारी, ड्रोननं होणार पार्सलची डिलिव्हरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 06:07 PM2022-06-28T18:07:17+5:302022-06-28T18:11:42+5:30

भारतीय टपाल विभागाचे कर्मचारी मिशन कर्मयोगी अंतर्गत प्रशिक्षण घेणार आहेत.

भारतीय टपाल विभागाचे सुमारे 4 लाख कर्मचारी मिशन कर्मयोगी अंतर्गत प्रशिक्षण घेणार आहेत. मिशन कर्मयोगी मंगळवार, 28 जूनपासून सुरू होत आहे. टपाल विभागातील कर्मचार्‍यांना कामास अनुकूल बनवणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या मिशन अंतर्गत, त्यांना सामान्य लोकांशी कसे वागावे आणि त्यांचे काम न डगमगता कसे करावे याचे प्रशिक्षण दिले जाईल.

केंद्रीय मंत्री देवुसिंह चौहान यांनी यासंदर्भातील माहिती दिली. टपाल विभागात यापूर्वीपासूनच अनेक मोठ्या सुधारणा केल्या जात आहेत. विभागाने भारतीय रेल्वेच्या सहकार्याने संयुक्त पार्सल वितरण सेवा सुरू केली आहे. याअंतर्गत दोन्ही सरकारी विभाग मिळून लोकांना त्यांच्या घरापर्यंत वस्तू पोहोचवत आहेत. याशिवाय गुजरातच्या कच्छसारख्या भागात ड्रोनद्वारे मालाची डिलिव्हरी केली जात आहे.

'टपाल विभाग ही सर्वात विश्वासार्ह संस्था आहे, जी नागरिकांना सेवा देत आहे. टपाल कर्मचारी आणि अडीच लाख ग्रामीण डाक सेवक हे विभागाचे आघाडीचे कार्यकर्ते आहेत आणि ते प्रत्येक नागरिकाला त्यांच्या घरापर्यंत सेवा देत आहेत. ही मालिका पुढे नेण्यासाठी मिशन कर्मयोगी 28 जूनपासून सुरू होत असून, त्याअंतर्गत 4 लाख टपाल कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडे पूर्वेकडील राज्यांमध्ये एकूण १०.९७ लाख अकाऊंट आहेत. यामध्ये एकूण 71.27 कोटींची रक्कम जमा आहे. यापैकी सर्वाधिक ग्रामीण भागातील आहे. 6 लाख गावांपैकी 25 हजार गावांमध्ये अद्यापही मोबाईल कव्हरेज नाही. आता या गावांमध्ये अतिरिक्त मोबाईल टॉवर उभारण्यावर काम केलं जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

ईशान्य भारतात दूरसंचार सुविधा सुधारण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. ते म्हणाले की, ईशान्येकडील राज्यांमध्ये एकूण 42,996 गावे आहेत. त्यापैकी 38,455 गावे आधीच समाविष्ट झाली आहेत. युनिव्हर्सल सर्व्हिसेस ऑब्लिगेशन फंड योजनेंतर्गत अतिरिक्त 1,632 मोबाईल टॉवर बसवले जात आहेत, असे राज्यमंत्री चौहान म्हणाले.

मणिपूरमध्ये गेल्या 4 वर्षांदरम्यान इंटरनेट युझर्सची संख्या 62 टक्के वाढली आहे. 7 जिल्ह्यांचे 325 ग्राम पंचायतींना ऑप्टीकल फायबरनं जोडलं आहे. त्यांना भारतनेट स्किम अंतर्गत ऑप्टीकल फायबर सेवा मिळाली आहे. याशिवाय राज्यातील 2515 गावांपैकी 2174 गावांना मोबाईल कव्हरेज मिळालं आहे. बाकी अन्य गावांमध्ये टॉवर लावण्याचा प्रस्ताव यापूर्वीच देण्यात आल्याचेही मंत्र्यांनी सांगितले.

चंदेल जिल्ह्याबाबत मंत्री म्हणाले की, डोंगराळ भाग असूनही जिल्ह्यातील 266 गावांपैकी 217 गावांना मोबाईल कव्हरेज मिळाले आहे. दूरसंचार विभाग लवकरच उर्वरित 49 गावांमध्ये मोबाईल टॉवर बसवण्याच्या तयारीत आहे. तसेच जिल्ह्यातील 156 ग्रामपंचायती सॅटेलाइटने जोडल्या गेल्या आहेत. उर्वरित पंचायती आगामी काळात भारतनेट सार्वजनिक खाजगी भागीदारी अंतर्गत जोडल्या जातील.