मानवतमध्ये दिवसाढवळ्या विद्यार्थ्याचे अपहरण; २५ हजारांच्या खंडणीसाठी रेल्वे पुलावरून फेकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 17:00 IST2026-04-13T17:00:03+5:302026-04-13T17:00:31+5:30
या घटनेत विद्यार्थ्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे

मानवतमध्ये दिवसाढवळ्या विद्यार्थ्याचे अपहरण; २५ हजारांच्या खंडणीसाठी रेल्वे पुलावरून फेकले
- मोहन बारहाते
मानवत : शहरात फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थ्याचे अज्ञात इसमांनी अपहरण करण्याचा प्रयत्न करत खंडणीसाठी मारहाण करून त्याला रेल्वे उड्डाणपुलावरून खाली फेकल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सय्यद सुफियान सय्यद शाकेर (वय १९, रा. उस्मानिया कॉलनी, परभणी) हा विद्यार्थी मानवत येथील फार्मसी महाविद्यालयात डी. फार्मसी प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. सोमवार सकाळी सुमारे १० वाजता तो कॉलेजकडे जात असताना महाराणा प्रताप चौक परिसरात अल्टो कार त्याच्या जवळ थांबली. कारमधील मास्कधारी इसमांनी त्याला जबरदस्तीने गाडीत बसवून अपहरण केले.
यानंतर विद्यार्थ्याकडे २५ हजारांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. मात्र त्याच्याकडे पैसे नसल्याने आरोपींनी त्याच्याकडील १ हजार रुपये काढून घेतले आणि त्यानंतर मानवतरोड येथील रेल्वे उड्डाणपुलावरून त्याला खाली फेकले. या घटनेत विद्यार्थ्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. विद्यार्थ्याने त्याचे वडील सय्यद शाकेर यांना कळवल्यानंतर त्याला तातडीने मानवत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी परभणी येथे हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना दिली असून या क्रूर प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.