परभणीला जंक्शनचा दर्जा, पण ४५ किमीच्या रेल्वे मार्गाची सुरक्षा चौकीवर! स्वतंत्र पोलीस ठाण्याची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 17:39 IST2026-05-04T17:39:15+5:302026-05-04T17:39:52+5:30
४५ किमी रेल्वे मार्गाची सुरक्षा चौकीच्या कारभारावर; परभणी रेल्वे जंक्शनला जीआरपी ठाणे निर्मितीची गरज

परभणीला जंक्शनचा दर्जा, पण ४५ किमीच्या रेल्वे मार्गाची सुरक्षा चौकीवर! स्वतंत्र पोलीस ठाण्याची प्रतीक्षा
- राजन मंगरुळकर
परभणी : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील परभणी हे महत्त्वाचे रेल्वे जंक्शन. दररोज किमान १० हजारांपेक्षा अधिक प्रवाशांची ये-जा या स्थानकावर आहे. दर दिवसाला ४० पेक्षा अधिक एक्सप्रेस रेल्वे विविध राज्यांमध्ये येथून मार्गस्थ होतात. असे असताना प्रवाशांच्या सुरक्षेबाबत मात्र अजूनही स्थानक कोसो दूर आहे. जंक्शनसारख्या महत्त्वाच्या स्थानकावर जीआरपी पोलिसांची केवळ एक चौकी कार्यान्वित आहे. चौकीतील अधिकारी, कर्मचारी मिळून सात ते आठ जणांवर ४५ किलोमीटरची रेल्वे लोहमार्गाची भिस्त अवलंबून आहे. त्यामुळे स्वतंत्र पोलिस ठाणे निर्मिती कधी होणार ? याची प्रतीक्षा लागली आहे.
नांदेड ते मनमाड रेल्वेमार्गावर नांदेड येथे जीआरपी पोलिस ठाणे आहे. यानंतर परभणी हे महत्त्वाचे जंक्शन असून येथे आरपीएफचे पोलिस ठाणे, तर जीआरपीची मात्र पोलिस चौकी कार्यान्वित आहे. मध्यरात्री लांब पल्ल्याच्या दक्षिण भारत व विविध ठिकाणी धावणाऱ्या रेल्वेमध्ये सर्वसाधारण, वातानुकूलित डबे अशा ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडेकोट असणे गरजेचे आहे. मागील काही वर्षांत मानवत, ढेंगळी पिंपळगाव, पेडगाव, देवलगाव अवचार, सिंगणापूर, पोखर्णी, पिंगळी अशा स्थानकाच्या दरम्यान छोट्या-मोठ्या घटनांमध्ये रेल्वेत दरोडा, चोरी झाल्याचे प्रकार घडले आहेत. सिग्नल तोडून तांत्रिक बिघाड करून काही चोरी झाल्याचेही नुकतेच समोर आले आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम बनविण्यासाठी परभणी रेल्वे जंक्शन येथे पोलिस ठाणे निर्मितीसह वाढीव मनुष्यबळाची गरज आहे.
...असे आहे जीआरपीचे कार्यक्षेत्र
परभणी रेल्वेस्थानकावर रेल्वे पोलिस दूरक्षेत्र चौकी आहे. येथे एक सहायक पोलिस निरीक्षक, दोन जमादार आणि तीन कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ आहे. परभणी स्थानकासह पिंगळी, पेडगाव, देवलगाव अवचार, मानवत स्थानकापर्यंत व गंगाखेड मार्गावर पाच किलोमीटरपर्यंत मिळून जीआरपी चौकीअंतर्गत ४५ किलोमीटर कार्यक्षेत्र आहे.
पुनर्विकासाचे काम सुरू, ठाणे निर्मिती कधी ?
अमृत भारत स्टेशनअंतर्गत परभणी रेल्वे जंक्शन, पूर्णा, गंगाखेड, सेलू, परतूर या पाच स्थानकांचे पुनर्विकासाचे काम सुरू आहे. मात्र, परभणी रेल्वे जंक्शन येथे हे काम होत असले तरी स्थानकावरील प्रवाशांची सुरक्षा आणि रात्रीच्या रेल्वेगाड्यांमधील सुरक्षेसाठी जीआरपी पोलिस ठाणे निर्मिती होणार तरी कधी, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
तर होते पोलिस ठाणे निर्मिती
दरवर्षीचे वार्षिक गुन्ह्याचे प्रमाण २०० पेक्षा अधिक आणि एखाद्या स्थानकाच्या शहर हद्दीतील लोकसंख्या ही दोन लाखांपेक्षा अधिक असेल तर त्या ठिकाणी रेल्वे पोलिस ठाणे निर्मिती केली जाते. या दोन्हीही निकषांमध्ये परभणी रेल्वेस्थानक बसत असतानाही यंत्रणेकडून प्रस्ताव मंजूर झालेला नाही. एकीकडे रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस ठाणे पाच ते सात वर्षांपूर्वी निर्माण झाले. मात्र, कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या जीआरपीचे ठाणे अद्यापही झालेले नाही.