पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 12:41 IST2026-05-05T12:40:19+5:302026-05-05T12:41:06+5:30
West Bengal next CM oath taking on 9 May: पश्चिम बंगालमध्ये भाजपने २००हून जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवले

पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
West Bengal next CM oath taking on 9 May: पश्चिम बंगालच्या निवडणुकांचे निकाल सोमवारी समोर आले. तब्बल १५ वर्षांनी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला. केवळ पक्षच नव्हे तर माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही १५ हजार मतांच्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. प. बंगाल विधानसभा निवडणुकीत यंदा मतदारांनी १५ वर्षांपासूनचे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसचे सरकार पायउतार करीत गेल्या सुमारे ५० वर्षांपासून राज्यात ठराविक काळानंतर सत्तापालट घडवून आणणारी एकतर्फी निवडणुकीची परंपरा कायम राखली. पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला असून, ९ मे रोजी सोहळा पार पडणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये ९ मे रोजी भाजपच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी
पश्चिम बंगालमध्ये एकूण २९३ जागांपैकी २९२ जागांचे निकाल राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर लागले. त्यापैकी २०६ जागांवर भाजपने विजय मिळवला. १५ वर्ष बंगालवर राज्य करणाऱ्या तृणमूल काँग्रेसला शंभरीही गाठता आली नाही. टीएमसीला ८० जागांवरच विजय मिळवता आला. इतकेच नव्हे माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. भाजपचे सुवेंदु अधिकारी यांनी ७३,९१७ मते मिळवली तर ममता बॅनर्जी यांना ५८,८१२ मते मिळाली. त्यामुळे ममता यांचा १५,१०५ मतांनी पराभव झाला. आता नव्या भाजप मुख्यमंत्र्यांचा शपथविधी ९ मे रोजी होणार आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी 'ही' नावे चर्चेत
ममता बॅनर्जींनंतर पश्चिम बंगालमध्ये महिला नेतृत्व कायम राहावे असा विचार झाल्यास मुख्यमंत्रीपदासाठी दीर्घकाळ राजकारणाचा अनुभव असलेल्या रूपा गांगुली यांचे नाव चर्चेत आहे. रूपा गांगुली या 'महाभारत' मालिकेतील 'द्रौपदी' भूमिकेतून घराघरात पोहोचवल्या. २०१५ पासून त्या पश्चिम बंगालच्या राजकारणात भाजपची भूमिका प्रभावीपणे मांडत आहेत. याशिवाय, ममता बॅनर्जींना सलग दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत पराभवाचे पाणी पाजणारे सुवेंदु अधिकारी देखील या शर्यतीत आहेत. त्यांना बंगालच्या राजकारणाचा दीर्घ अनुभव आहे आणि ते अतिशय प्रभावी नेते आहेत. या दोघांव्यतिरिक्त प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य या नावाचीदेखील चर्चा आहे. एक हुशार राजकारणी म्हणून ते नावाजलेले आहेत. जुलै २०२५ पासून ते भाजपचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून पश्चिम बंगालचे प्रतिनिधित्व करणारे राज्यसभेचे सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत.