'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
By कोमल खांबे | Updated: May 5, 2026 13:34 IST2026-05-05T13:30:24+5:302026-05-05T13:34:21+5:30
अभिषेक बच्चन, संजय दत्त, विद्या बालन, फरदीन खान, बोमन इराणी हे बॉलिवूड कलाकार 'राजा शिवाजी'मध्ये महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. 'राजा शिवाजी'मध्ये काम करण्यासाठी या कलाकारांनी किती मानधन घेतलं, याबाबत रितेशने खुलासा केला आहे.

'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
Raja Shivaji: 'राजा शिवाजी' हा ऐतिहासिक मराठी चित्रपट १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमात रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून सिनेमाचं दिग्दर्शनही त्यानेच केलं आहे. 'राजा शिवाजी' सिनेमात बॉलिवूड कलाकारांची फौज आहे. अभिषेक बच्चन, संजय दत्त, विद्या बालन, फरदीन खान, बोमन इराणी हे बॉलिवूड कलाकार 'राजा शिवाजी'मध्ये महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. 'राजा शिवाजी'मध्ये काम करण्यासाठी या कलाकारांनी किती मानधन घेतलं, याबाबत रितेशने खुलासा केला आहे.
'राजा शिवाजी' सिनेमाच्या निमित्ताने रितेश नागपूरमध्ये गेला होता. तिथे कार्यक्रमात बोलताना त्याने 'राजा शिवाजी' सिनेमासाठी बॉलिवूड कलाकारांनी कोणतंही मानधन घेतलं नसल्याचा खुलासा केला. रितेश म्हणाला, "या सिनेमात खूप मोठे मोठे कलाकार आहेत. या सगळ्याच कलाकारांनी खूप प्रामाणिकपणे काम केलं आहे. मैत्रीचं नातं म्हणून काम केलंय. कितीतरी कोटींचं बजेट असलेला सिनेमा वगैरे असं काहीच नाहीये. अभिषेक बच्चन यांनी सिनेमात मोफत काम केलं आहे. सलमान खान, विद्या बालन, बोमन इराणी, जिनिलीया देशमुख, फरदीन खान या सगळ्यांनीच सिनेमासाठी कोणतंही मानधन घेतलेलं नाही. रितेश देशमुखनेही सिनेमात मोफत काम केलंय. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे".
"जेव्हा महाराजांचा विषय येतो तेव्हा या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आम्ही हा सिनेमा करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे मीडियामध्ये अनेक तर्क लावले गेले आहेत. कृपया तसं करू नका. आपल्या परिने सगळ्यांनी जे काही होत असेल ते करण्याचा प्रयत्न केला. हे सगळे माझे मित्र आहेत. त्यांना वाटलं की आपला मित्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर एक सिनेमा काढायचा प्रयत्न करतोय तेही मराठी भाषेमध्ये... आपल्याकडे बजेटची तेवढी तरतूद नसते. मी हा सिनेमा हिंदीमध्येही काढू शकलो असतो. पण माझी इच्छा होती. मला मराठी भाषेमध्येच हा चित्रपट या स्केलला काढायचा होता. त्यामुळे या सगळ्यांचा मी मनापासून ऋणी आहे", असंही रितेश पुढे म्हणाला.