पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने स्पष्ट बहुमतासह दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासोबतच भाजपाने राज्यातील तृणमूल काँग्रेसची १५ वर्षांपासूनची सत्ता संपुष्टात आणली आहे. मात्र बंगालमध्ये भाजपाने तृणमूल काँग्रेसच्या केलेल्या पराभवाचा फायदा काँग्रेसलाही झाला आहे. एकीकडे तृणमूल काँग्रेसच्या पराभवावरून राहुल गांधी भाजपा आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत आहेत. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसच्या पराभवानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगालमधील करीमपूरमधील आपलं कार्यालय तृणमूलकडून ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार तृणमूल काँग्रेसने या कार्यालयावर अनेक वर्षांपासून बेकायदेशीररीत्या कब्जा करून ठेवला होता. आता सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिले की, जर ममता बॅनर्जीं यांनी स्वच्छ प्रतिमेचं सरकार चालवलं असतं, जर ममता यांनी बंगालमध्ये ध्रुवीकरण केलं नसतं, तर इथे भाजपासाठी मार्ग मोकळा झाला नसता, असे राहुल गांधी म्हणाले होते. दरम्यान, आता काँग्रेस यासाठी कुणाचे आभार मानणार आहे, असा खोचक प्रश्न आणखी एकाने विचारले.
दरम्यान, काँग्रेसमधील काही जण आणि इतर लोक तृणमूल काँग्रेसच्या पराभवामुळे आनंदित झाले आहेत. मात्र आसाम आणि बंगालमध्ये झालेली जनादेशाची चोरी ही भारतामधील लोकशाही संपुष्टात आणण्याच्या भाजपाच्या मोहिमेचा भाग आहे. लहानसहान राजकारण एकीकडे राहू द्या, पण हा प्रश्न एक पक्ष किंवा दुसऱ्या पक्षाबाबत नाही आहे, असे राहुल गांधी म्हणाले होते.