आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 10:34 IST2026-05-05T10:30:50+5:302026-05-05T10:34:53+5:30
ममता बॅनर्जी यांचा पराभव करणारे भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी आता भाजपाचे पुढचे लक्ष्य उत्तर प्रदेश असल्याचे स्पष्ट केले. ममता बॅनर्जींसारखाच पराभव अखिलेश यादवांचा करणार असल्याचे विधान केले आहे.

आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या प्रयत्नांना अखेर यश आले. तब्बल २०६ जागा जिंकत भाजपाने तृणमूल काँग्रेस सत्तेतून खाली खेचले. विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचाही पराभव झाला. ज्यांनी ममता बॅनर्जी यांना पराभूत केले, त्याच सुवेंदू अधिकारींनी आता पुढचा नंबर अखिलेश यादवांचा म्हणत समाजवादी पार्टीविरोधात दंड थोपटले आहेत.
सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा तब्बल १५ हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने पराभव केला. या पराभवानंतर बोलताना सुवेंदू अधिकारींनी आम आदमी पक्षासारखेच तृणमूल काँग्रेसचे राजकारण होते, असे म्हटले आहे.
आता मिशन उत्तर प्रदेश
आमदार सुवेंदू अधिकारी यांनी भाजपाचे पुढचे लक्ष्य आता उत्तर प्रदेश असल्याचे सांगून टाकले. ते म्हणाले, "ममता (ममता बॅनर्जी), तेजस्वी (तेजस्वी यादव), राहुल (राहुल गांधी) संपले आहेत. आता पुढचे लक्ष्य अखिलेश (अखिलेश यादव) आहेत."
उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी विरुद्ध भाजपा
पश्चिम बंगाल, आसाम जिंकल्यानंतर आता भाजपाने २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर लक्ष्य केंद्रित केले आहे. उत्तर प्रदेशात फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये निवडणूक होणार आहे. म्हणजे अवघ्या आठ महिन्यांवर उत्तर प्रदेशची निवडणूक येऊ ठेपली आहे.
उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाची ताकद पूर्वीसारखी राहिलेली नाही. काँग्रेसचा प्रभावही जेमतेम आहे. उत्तर प्रदेशात भाजपाची थेट लढाई अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षासोबत असणार आहे.
लोकसभा निवडणुकीत सपा ठरली होती सरस
दोन वर्षापूर्वी म्हणजे २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए अशीच लढत झाली होती. त्या निवडणुकीत अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने ३७ जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसनेही ६ जागांवर विजय मिळवला होता.
भाजपाला ३३ जागांवरच विजय मिळवता आला. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत भाजपाला मोठा झटका बसला होता. कारण २०१९ मध्ये भाजपाने तब्बल ६२ जागा जिंकल्या होत्या. तर समाजवादी पक्षाला फक्त ५ जागांवरच विजय मिळाला होता. काँग्रेसही एका जागेपुरतीच मर्यादित राहिली होती. त्यामुळे आता उत्तर प्रदेश पुन्हा राखण्यासाठी भाजपाला समाजवादी पक्षासोबतच लढत द्यावी लागणार आहे.