"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 19:38 IST2026-04-17T19:37:47+5:302026-04-17T19:38:29+5:30
अमित शाह यांनी गाझियाबाद लोकसभा मतदारसंघाचा उल्लेख करत तिथे २८ लाख मतदार असल्याचे सांगितले. यावर अखिलेश यादव यांनी आक्षेप घेत, हे आकडे कोणत्या जनगणनेवर आधारित आहेत, असा सवाल केला?

"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
सध्या संसदेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात तीन महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासंदर्भात मतदान होणार आहे. यापूर्वी गृहमंत्री अमित शाह सभागृहाला उत्तर देत असताना, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी त्यांना आकडेवारीवरून टोकले. अमित शाह यांनी गाझियाबाद लोकसभा मतदारसंघाचा उल्लेख करत तिथे २८ लाख मतदार असल्याचे सांगितले. यावर अखिलेश यादव यांनी आक्षेप घेत, हे आकडे कोणत्या जनगणनेवर आधारित आहेत, असा सवाल केला?
काय म्हणाले अखिलेश यादव?
अखिलेश यादव म्हणाले की, "मंत्री महोदय जी आकडेवारी देत आहेत, ती कोणत्या जनगणनेच्या आधारावर देत आहेत. कारण गाझियाबादचा जो आकडा सांगितला जात होता तो फारच कमी आहे. जो सध्याच्या परिस्थितीच्या दुप्पट असण्याची शक्यता आहे. यावर अमित शाह म्हणाले, "हे आकडे जुनेच आहेत आणि मी तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्ही मतदारसंघांची पुनर्रचना (परिसीमन) होऊ दिली, तर नवीन आकडेवारी समोर येईल आणि एका जागेच्या दोन जागा होतील." दरम्यान, "अखिलेश यादव स्वतःच्या भूमिकेच्या बाजूने बोलत आहेत की विरोधात? हेच समजत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
गृहमंत्री पुढे म्हणाले, अनेक लोकसभा मतदारसंघ एवढे मोठे आहेत की, खासदारांना त्यांच्या मतदारांना सामोरे जाणेही शक्य होत नाही. लोकसंख्या खूप जास्त आहे. एक खासदार ३९ लाख मतदारांना कसे हाताळू शकेल? म्हणूनच आपल्या संविधानात वेळेवेळी मतदारसंघ पुनर्रचनेची तरतूद आहे. २० लाखांपेक्षा जास्त मतदार असलेल्या १२७ जागा आहेत. एक खासदार २० लाख मतदारांपर्यंत कसा पोहोचू शकेल? एका जागेवर ४८ लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत.