काँग्रेसकडे विचार नाही, दृष्टी नाही अन् इच्छाशक्तीही नाही..; पंतप्रधान मोदींचा राज्यसभेत घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 17:31 IST2026-02-05T17:31:10+5:302026-02-05T17:31:27+5:30
'देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देश अर्थव्यवस्थेत सहाव्या क्रमांकावर होता, काँग्रेसने 10 व्या क्रमांकावर नेले.'

काँग्रेसकडे विचार नाही, दृष्टी नाही अन् इच्छाशक्तीही नाही..; पंतप्रधान मोदींचा राज्यसभेत घणाघात
Parliament Session Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज(दि.5) राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर प्रतिक्रिया दिली. मोदींचे भाषण सुरू होताच विरोधी पक्षांनी जोरदार गोंधळ घातला आणि राज्यसभेतून सभात्याग केला. यावर पीएम मोदी म्हणाले, लोक थकले, ते बिचार निघून गेले. पण, कधी ना कधी त्यांना उत्तर द्यावे लागेल की, देशाची अशी अवस्था करून ठेवली होती की, कोणताही देश व्यापार करारासाठी येत नव्हता.
गोंधळात भाषण सुरूच...
विरोधकांच्या घोषणाबाजीदरम्यानही पंतप्रधान मोदींनी आपले भाषण सुरू ठेवले. यावेळी ते म्हणाले, सरकारने समाजातील प्रत्येक घटकासाठी काम केले आहे आणि देशाच्या विकासाचा मार्ग स्पष्ट आहे. 21व्या शतकाचा पहिला क्वार्टर पूर्ण झाला आहे. आता दुसरा क्वार्टर अत्यंत निर्णायक असणार आहे. विकसित भारताच्या निर्मितीसाठी हा काळ वेगाने पुढे जाणारा आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला आज हे जाणवत आहे की, भारत एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे.
पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका
पंतप्रधान मोदी म्हणाले, जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देश अर्थव्यवस्थेत सहाव्या क्रमांकावर होता, परंतु या लोकांनी (काँग्रेसने) देशाला 10 व्या क्रमांकावर नेले. मात्र, आज देश तिसऱ्या क्रमांकावर पोहोचत आहे. जगात काँग्रेसची प्रतिमा जी आहे, ती पुसून टाकण्यासाठी मला बराच वेळ लागत आहे. लाल किल्ल्यावरून काँग्रेस पंतप्रधानांची जुनी भाषणे ऐका. त्यांच्याकडे कोणताही विचार नव्हता, दृष्टी नव्हती आणि इच्छाशक्ती नव्हती, अशी बोचरी टीका मोदींनी केली.
भारतासमोर अनेक संधी...
देश आज वेगाने विकास करत आहे. आपण एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचत आहोत. आपण आता ना थांबायचे, ना मागे वळून पाहायचे. उद्दिष्ट गाठल्याशिवाय विश्रांती नाही. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात जागतिक परिस्थितीवर भाष्य करताना सांगितले की, आज भारताच्या नशिबी अनेक अनुकूल संधी एकाच वेळी आल्या आहेत. जगातील अनेक मोठे देश वृद्ध होत चालले आहेत, तर भारत मात्र विकासाच्या नव्या उंची गाठत असून, तो दिवसेंदिवस तरुण देश म्हणून पुढे येत आहे.
जगाचे भारताकडे वाढते आकर्षण
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, आज जगभरात भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. भारताकडे जगातील सर्वात मोठी युवा प्रतिभा आहे. तरुणांकडे स्वप्नही आहेत आणि ती पूर्ण करण्याची क्षमता देखील आहे. जागतिक आव्हानांवर तोडगा काढण्याची ताकद आज भारताकडे आहे. भारताची आर्थिक वाढ वेगवान आहे, तर महागाई नियंत्रणात आहे. ही बाब देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक मजबूत बनवते.