उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील सेक्टर-१५० मध्ये झालेल्या एका भीषण अपघातात एका सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू झाला असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. एका रिकाम्या प्लॉटमध्ये साचलेल्या खोल पाण्यात कार कोसळल्याने युवराज मेहता या तरुणाचा वेदनादायक अंत झाला. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, दाट धुक्यात रस्त्याच्या कडेला ना रिफ्लेक्टर होते, ना कोणताही इशारा देणारा बोर्ड. या अपघातामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्राधिकरणाविरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, युवराज मेहता गुरुग्राममधील एका खासगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. रात्री उशिरा तो ऑफिसवरून घरी परतत असताना धुक्यामुळे रस्ता स्पष्ट दिसत नव्हता. रस्त्याच्या कडेला असलेला नाला किंवा रिकाम्या प्लॉटचा अंदाज न आल्याने त्यांची कार घसरली आणि नाल्याची भिंत तोडून थेट पाण्याने भरलेल्या खोल प्लॉटमध्ये जाऊन पडली.
वडिलांना केलेला तो शेवटचा फोन
थंड पाण्यात कार अडकल्यानंतर युवराजने आपले वडील राजकुमार मेहता यांना फोन केला आणि व्याकुळ होऊन म्हणाला, "बाबा, मी पाण्यात पडलो आहे, खूप थंडी वाजतेय, मला वाचवा, लवकर या..." यानंतर तो मदतीसाठी सतत ओरडत होता, पण दुर्दैवाने वेळेत कोणीही त्याच्या मदतीला धावून आले नाही. जवळून जाणाऱ्या काही प्रवाशांनी आवाज ऐकला, पण खोल पाणी असल्याने कोणीही हिम्मत दाखवली नाही आणि केवळ फोन करत राहिले. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत युवराजचा मृत्यू झाला.
प्राधिकरणाविरोधात संताप
स्थानिक नागरिकांच्या मते, या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरक्षेचा अभाव होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला रिफ्लेक्टर किंवा धोक्याचे फलक लावलेले नव्हते. अपघाताची माहिती मिळताच दुसऱ्या दिवशी सकाळी सोसायटीतील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत प्राधिकरणाविरोधात जोरदार निदर्शने केली. "येथे यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत, पण वारंवार तक्रार करूनही ठोस पाऊल उचललं गेलं नाही" असा आरोप नागरिकांनी केला.
७० फूट खोल प्लॉट तातडीने भरला
नागरिकांच्या आंदोलनानंतर प्रशासन आणि प्राधिकरणाला जाग आली. त्यांनी तातडीने तो ७० फूट खोल प्लॉट राडारोडा आणि कचरा टाकून भरून घेतला. मात्र, मृत युवराजच्या वडिलांनी संताप व्यक्त करत म्हटलं की, "आता हे करून काय उपयोग? जर प्राधिकरणाने वेळीच सुरक्षेचे उपाय केले असते, तर आज माझा मुलगा जिवंत असता."