दिवसभर काम, अन् संध्याकाळी द्यायचे रिपोर्ट; 'त्या' ऑफिसमध्ये ४० दिवस 'अंडरकव्हर' होते पोलीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 13:12 IST2026-04-14T12:56:54+5:302026-04-14T13:12:39+5:30
नाशिकमधील टीसीएस कंपनीत सुरु असलेल्या प्रकाराचा पोलिसांनी धाडसीपणे छडा लावला.

दिवसभर काम, अन् संध्याकाळी द्यायचे रिपोर्ट; 'त्या' ऑफिसमध्ये ४० दिवस 'अंडरकव्हर' होते पोलीस
Nashik Crime: नाशिकमधील नामांकित बीपीओ कंपनीत सुरू असलेल्या लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाचा पोलिसांनी अत्यंत धाडसी पद्धतीने छडा लावला आहे. सात महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तब्बल ४० दिवस अंडरकव्हर राहून कंपनीत काम केले आणि आरोपींच्या काळ्या कृत्यांचे पुरावे गोळा केले. या कारवाईदरम्यान, नाशिकच्या या प्रकरणात आतापर्यंत ८ गुन्हे दाखल झाले असून ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्तांची स्पेशल ७ मोहीम
फेब्रुवारी महिन्यात पोलिसांना या कंपनीतील काही संशयास्पद हालचालींची आणि महिला कर्मचाऱ्यांच्या छळाची गुप्त माहिती मिळाली होती. शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एसआयटी प्रमुख संदीप मितके यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष योजना आखण्यात आली. यानुसार, सात महिला पोलीस अधिकारी कंपनीत कर्मचारी म्हणून रुजू झाल्या.
कसं होतं ऑपरेशन?
या महिला अधिकारी रोज कंपनीत जाऊन मीटिंग आणि वर्क स्टेशनमध्ये सहभागी व्हायच्या. आरोपी महिलांसोबत कसे वागतात, त्यांच्यावर काही दबाव टाकला जातो का, यावर त्या बारकाईने लक्ष ठेवून होत्या. दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी त्या आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गुप्तपणे अहवाल द्यायच्या. तब्बल ४० दिवस चाललेल्या या अंडरकव्हर ऑपरेशनमुळे पोलिसांच्या हाती ठोस पुरावे लागले.
प्रकरण समोर कसं आलं?
२६ मार्च रोजी देवळाली पोलीस ठाण्यात एका महिला कर्मचाऱ्याने वरिष्ठावर बलात्काराचा आरोप करत तक्रार दिली. त्यानंतर तपासाचे चक्र वेगाने फिरले. एका पुरुष कर्मचाऱ्यासह इतर आठ जणांनीही मुंबई नाका पोलीस ठाण्यात छळाची तक्रार दाखल केली. २६ मार्च ते ३ एप्रिल या काळात एकूण ८ एफआयआर दाखल करण्यात आले. यामध्ये बलात्कार, विनयभंग, धार्मिक भावना दुखावणे अशा गंभीर कलमांचा समावेश आहे.
धर्मांतराचे जाळे आणि विदेशी फंडिंगचा संशय
या प्रकरणात केवळ लैंगिक अत्याचारच नाही, तर धर्मांतराचा मोठा कट असल्याचा संशय पोलिसांना आहे. आरोपींनी २०२२ पासून कट्टरता परसवण्यासाठी काम सुरु केल्याचा एसआयटीला संशय आहे. संशयितांच्या बँक खात्यांची चौकशी सुरू असून, त्यांना परदेशातून किंवा एखाद्या संघटनेकडून फंडिग होते का? याचा तपास सुरू आहे. एका माजी कर्मचाऱ्याने खुलासा केला आहे की, विशिष्ट समुदायाला लक्ष्य करून संशयित आरोपी काम संपल्यानंतरही कंपनीत थांबून संशयास्पद हालचाली करायचे.
कंपनीची कारवाई आणि पोलिसांना सहकार्य
देशातील प्रतिष्ठित आयटी कंपनी असलेल्या टीसीएसने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आठपैकी सात आरोपींना कंपनीने तत्काळ कामावरून काढून टाकले आहे. आठवा आरोपी एचआर विभागातील असून, पीडितेने ई-मेलद्वारे तक्रार करूनही त्याने कारवाई न केल्याचा त्याच्यावर ठपका आहे. कंपनीने आरती सुब्रह्मण्यम यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष समिती नेमली असून, नाशिकमधील हे प्रकरण अत्यंत धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया दिली. सध्या पोलीस या प्रकरणातील ई-मेल, चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्सची कसून तपासणी करत असून, यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.